मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदाचा राजीनामा दिल्याने आमच्याकडे बहुमत उरलं नाही, त्यामुळे मी राज्यपालांना भेटून राजीनामा देत आहे, अशी घोषणा करतानाच नवं सरकार बनविणाऱ्यांना माझ्या शुभेच्छा. त्यांची विरोधाभास असलेली आघाडी त्यांनाच लखलाभ असो, असा टोलाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला लगावला.

अजित पवारांचा राजीनामा आल्याने आमच्याकडेही बहुमत उरलेलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचा गट आमच्यासोबत आल्याने आम्ही सत्ता स्थापन करणार नाही. आम्ही आमदार फोडणार नाही. ही पत्रकार परिषद झाल्यावर मी राज्यपालांना भेटून राजीनामा देणार आहे. शिवसेनेने लाचारी पत्करली आहे म्हणूनच शिवसेनेने काल सोनिया गांधी यांच्या नावाची शपथ घेतली. यापेक्षा लाचारी काय? आम्ही विरोधात बसण्याचा निर्णय घेतला आहे असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाने भारतीय जनता पक्षाला उद्या विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाकडे बहुमत नसल्याची कबुली देत देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे सुपूर्द करणार असल्याचे सांगितले.

सोनिया गांधींच्या नावाची शपथ घेत शिवसेनेने लाचारी पत्करली आहे: फडणवीस