मुंबई : राज्यात विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवावी अशी मागणी युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे वरळी विधानसभेतून लढणार असल्याची घोषणा आमदार अनिल परब यांनी वरळीतल्या शिवसैनिकांनामध्ये केली आहे. वरळीतील गटप्रमुखांच्या मेळाव्यात त्यांनी ही घोषणा केल्याचे समोर आले आहे. तसेच ‘कामाला लाग‘, असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे. याआधी युवासेनेचे पदाधिकारी वरुण सरदेसाई यांनी देखील इन्स्टाग्रामवर यासंदर्भात पोस्ट टाकून आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढण्याची मागणी केली होती.

तसेच वरळी आदर्श नगर येथे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा शुक्रवारी सायंकाळी आयोजित करण्यात आला होता. शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी यावेळी शिवसैनिकांना मार्गदर्शन केलं. त्याचवेळी त्यांनी आदित्य ठाकरे वरळीतून निवडणूक लढणार असल्याची घोषणा केल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. तसेच आदित्या ठाकरे यांना वरळीतून उमेदवारी देण्याची मागणी शिवसेना प्रमुखांकडे करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

या मेळाव्यादरम्यान, शिवसेनेचे वरळीतील विद्यमान आमदार सुनील शिंदे आणि सचिन अहिर हेदेखील उपस्थित होते. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे या दोघांची साथ लाभल्यास मोठ्या मताधिक्याने आदित्य ठाकरे हे विधानसभेवर निवडून जातील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. यापूर्वी शिंदे यांची सचिन अहिर यांचा पराभव केला होता. परंतु अहिर यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीची ताकद कमी झाली असून शिवसेनेची ताकद वाढली आहे. त्यामुळे हा मतदारसंघ आदित्य ठाकरे यांच्यासाठी सुरक्षित मानला जात आहे.

आदित्य ठाकरे ‘वरळी’ विधानसभेतून लढणार हे जवळपास निश्चित