नाशिकः नाशिकच्या देवळाली कॅम्पमध्ये लष्कराच्या भरतीसाठी तब्बल ३० हजार तरुण दाखल झाले आहेत. देवळाली कॅम्प येथील ११६ टीए पॅरा बटालियनच्या ६३ जागांसाठी आजपासून लष्कराने भरतीची प्रक्रिया सुरू केलीय. या भरतीसाठी फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातील ९ राज्य व ३ केंद्र शासित प्रदेशातील शेकडो युवक देवळालीत दाखल झाले आहेत.
आज म्हणजेच ३० ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील तरुणांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. आनंद रोड मैदान ते सह्याद्री नगर जवळील मैदानावर लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्त्वात ही भरती प्रक्रिया होत आहे. यासाठी पोलिस प्रशासनाकडून ३ अधिकारी आणि ६० पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तरुणांची गर्दी वाढल्याने देवळाली कॅम्प परिसरात गोंधळाचे वातावरण असून नियंत्रणासाठी अधिकाऱ्यांनी काठी उगारली तरी पळापळ होत असल्याचं चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे गोंधळ आणखी वाढला. यावेळी अनेक तरुण रस्त्याजवळच्या नाल्यात पडत होते. हजारो युवकांची गर्दी पाहून अखेरीस पहाटे चार वाजताच भरतीसाठी प्राथमिक चाचणी सुरू करण्यात आली आहे. आज महाराष्ट्रातून आलेल्या तरुणांची भरती होत असून उद्या राजस्थान आणि त्यानंतर अन्य राज्यांची भरती होणार आहे. त्यामुळे भरती प्रक्रिया चार ते पाच दिवस चालणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
