मुंबई : आगामी लोकसभेच्या निवडणुकांसाठी काँग्रेस-एनसीपीदरम्यानचे जागावाटप पूर्णत्वाला आली असताना आता भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीची सुद्धा गुप्तपणे चर्चा सुरू झाल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे या दोन्ही पक्षांमध्ये आतापर्यंत एकूण ४ बैठका मुंबईतच पार पडल्याचे वृत्त प्रसार माध्यमांच्या हाती आले आहे.
त्यासाठी भारतीय जनता पक्षाने केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील तर दुसरीकडे शिवसेनेकडून उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यावर जवाबदारी सोपविण्यात आली आहे. परंतु, अजून या बैठकीतील चर्चेनंतरही विशेष काही हाती लागू शकले नाही असे समजते. काँग्रेस-एनसीपीमधील प्रत्येक बैठकीनंतर आघाडीतील पेच सुटत गेला. परंतु, दुसरीकडे युतीतील गुंता वाढतानाच दिसत आहे.
शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामधील चौथ्या बैठकीत तर “तुम्हाला काहीच मान्य नसेल तर चर्चा करायची कशाला?” असा थेट प[प्रश्न भाजपमधील जवाबदारी देण्यात आलेल्या नेत्यांनी शिवसेनेला विचारल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. परंतु, प्रसार माध्यमांना अंधारात ठेवून कोणताही गाजावाजा न करता युतीची चर्चा मुंबईतच आणि वेगवेगळ्या जागा बदलत सुरु होती.
