मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन तब्बल ५५ वर्षानंतर मुंबईत होणार आहे. तत्पूर्वी संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर पहिली ३ वर्षे म्हणजे १९६१ ते १९६३ या कालावधीत मुंबईत झाले होते. परंतु, त्यानंतर आता थेट २०१८ साली हे अधिवेशन मुंबईत होत आहे. असे असले तरी हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार की नागपूरका याबाबत शेवटपर्यंत संभ्रम कायम होता. अखेर सोमवारपासून ते मुंबईतच सुरू होत आहे.
विशेषम्हणजे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीच्या वेळी नागपूर करार झाला होता. या करारानुसार विदर्भ संयुक्त महाराष्ट्रामध्ये सहभागी झाला. त्या करारानुसार त्यावेळी विदर्भवासीयांच्या अनेक मागण्या होत्या, त्यात नागपूरला उपराजधानीचा दर्जा देणे आणि प्रत्येक वर्षी विधिमंडळाचे एक अधिवेशन नागपूर येथे घेणे या दोन महत्त्वाच्या मागण्या होत्या.
त्या करारानुसार विधिमंडळाचे काही अपवाद वगळता हिवाळी अधिवेशन नेहमी नागपूर येथे होत असे. या पूर्वापार परंपरेला फाटा देत २०१८ चे पावसाळी अधिवेशन नागपूर येथे घेण्यात आले होते. पावसाळी अधिवेशन नागपूर येथे घेण्यास विरोधी पक्ष, सरकारमधील भागीदार असलेली शिवसेना आणि अनेक अधिका-यांचा विरोध होता. तरी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी हट्टाने ते अधिवेशन नागपूर येथे घेण्याच्या निर्णयावर ठाम राहिले.
