मुंबई : काल शिवतीर्थावर झालेल्या प्रचंड सभेत राज ठाकरेंनी दिलेला ‘मोदीमुक्त भारत’ चा नारा भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचे चित्र आहे. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी यांनी राज ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे.

राज ठाकरे यांनी आपला स्तर पाहून बोलावं आणि आधी राज ठाकरे यांच्या भाषणात बाळासाहेब ठाकरे यांचा प्रभाव दिसायचा आणि हल्ली राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा प्रभाव दिसून येत आहे अशी बोचरी टीका केली.

महाराष्ट्रातील जनतेने ज्यांना रोजगारमुक्त केलं आहे त्यांनी कालच्या सभेत ‘मोदीमुक्त भारत’ ची मुक्ताफळे उधळली आहेत अशी टीका आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांच्यावर केली आहे. त्यांनी दिलेला ‘मोदीमुक्त भारत’ चा नारा म्हणजे जरा जास्तच झाले आहे, त्यामुळे मनसे अध्यक्षांनी आपला स्तर पाहून बोलावे असा टोला लगावला.

२०१४ मध्ये महाराष्ट्राची विधानसभा मनसेमुक्त झाली आणि मुंबई महापालिकेतील उरले सुरले नगरसेवकही पळून गेले. त्यामुळे यापुढे महाराष्ट्रातील जनता मनसेवर विश्वास ठेवणार नाही अशी टीका आशिष शेलार यांनी केली.

तर दुसरीकडे भाजपचे आमदार अतुल भातखळकर म्हणाले की, हे पराभूत मानसिकतेतून केलेली केविलवाणी धडपड असून, महाराष्ट्रानेच त्यांना मनसेमुक्त केलेलं आहे. मुळात मोदीमुक्त भारत करण्यासाठी त्यांच्याकडे नेते कोण आहेत असा सवाल करत ते गल्लीपुरतेच मर्यादित आहेत अशी बोचरी टीका सुद्धा केली.

Ashish shelar criticised Raj Thackeray