सांगली : पुण्यातील कोरेगाव-भीमा दंगलीचा फायदा स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी आणि मतांसाठी करण्यात आल्याचा आरोप संभाजी भिडेंनी पत्रकार परिषद घेऊन केला. स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील वातावरण पेटवले असा आरोप संभाजी भिडे यांनी प्रकाश आंबेडकरांवर केला.

भीमा-कोरेगाव दंगलीला खरे जवाबदार हे एल्गार परिषद घेणारे आहेत. पुण्यातील शनिवारवाड्यावर जे एल्गार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होत, त्या ठिकाणी उमर खालिदला आमंत्रण होत आणि या एल्गार परिषदेच्या आयोजनाचा उद्देश भीमा-कोरेगाव दंगल घडवणे हाच होता. परंतु राज्य सरकार त्या एल्गार परिषदेच्या आयोजकांना आणि नेत्यांना ताब्यात घेण्याऐवजी मला आणि एकबोटेंना अटक करण्याची मागणी म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार असल्याचे संभाजी भिडे पत्रकार परिषदेत म्हणाले.

सध्या राज्यात निवडणूक जवळ आल्याने केवळ दलितांना खुश करण्यासाठी आणि त्यांची मत मिळावीत म्हणून राजकीय पक्षांकडून भीमा-कोरेगाव प्रकारचा वापर केला जात आहे. गेल्या ४-५ वर्षात मी भीमा-कोरेगाव परिसरात फिरकलो सुद्धा नाही तरी माझ्यावर आरोप होत असताना सर्व राजकीय पक्ष केवळ राजकीय फायद्यासाठी मूग गिळून गप्प आहेत असा आरोप ही त्यांनी केला. प्रकाश आंबेडकरांनी माझ्यावर आरोप करताना कोणतही तारतम्य राखलं नाही. एखाद्या लहान मुलाला चॉकलेट देऊन जसे पढवून बोलायला लावले जाते अगदी तसेच प्रकाश आंबेडकरांचे वर्तन आहे. मला अटक करून काय साध्य होणार असा प्रति प्रश्न सुद्धा संभाजी भिडेंनी पत्रकार परिषदेत केला. आपण सत्याचा पुरस्कार करतोय हे दाखवण्यासाठीच प्रकाश आंबेडकर माझ्या अटकेची मागणी करत आहेत. भीमा कोरेगाव दंगलीच्या वेळी प्रकाश आंबेडकर त्याठिकाणी होते हि माहिती कोणी दिली, त्यांची नाव उघड करून सरकारने चौकशी करावी असं ही ते पत्रकार परिषदेत स्पष्ट पणे म्हणाले.

Prakash Ambedkar provoked situation after bhima koregaon riots