मुंबई: बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सलग ७व्या दिवशीसुद्धा सुरूच असल्याने सामान्य मुंबईकरांचे प्रचंड हाल सुरुच आहेत. दरम्यान, या संपाबद्दल आज मुंबई उच्च न्यायालयात एका याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने बेस्ट कर्मचाऱ्यांच्या भूमिकेबद्दल कडक शब्दांत नाराजी व्यक्त केली.
त्यात, सर्वसामान्य लोकांना वेठीला धरू नका, अशा शब्दांमध्ये मुंबई उच्च न्यायालयानं बेस्ट कर्मचाऱ्यांना सुरु असलेल्या आक्रमक संपावरून फटकारलं आहे. परंतु, सदर विषयावर सुनावणी सुरु असताना राज्य सरकारचे महाधिवक्ते कोर्टात गैरहजर राहिल्याचे वृत्त आहे. त्यामुळे अखेर न्यायालयानं सदर याचिकेवर आजची सुनावणी तहकूब केली.
आज सकाळी राज्य मंत्रालयात या संबंधित विषयावर तोडगा काढण्यासाठी उच्च स्तरीय चर्चा झाली. परंतु, त्यानंतर सुद्धा कामगारांचा संप सुरूच आहे. या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत फोनवर चर्चा झाली. तर याच संपाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर पोहोचले होते. त्यामुळे दिवसभरात अनेक राजकीय घटनाक्रम घडताना दिसत आहे.
