सोलापूर : भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे अजून एका वादात सापडले आहेत. याआधी शेतकऱ्यांचा ‘साले’ असा अपमानजनक उल्लेख करणाऱ्या रावसाहेब दानवेंनी आता कहर केला आहे. सोलापूरातील महायुतीचा विजयी संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात दानवे यांनी पुलवामा जिल्ह्यातील सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या भ्याड अतिरेकी हल्ल्याचा संदर्भ देताना त्यांनी शहीद जवानांऐवजी त्यांचा थेट ‘अतिरेकी’ असा उल्लेख केला. दानवे म्हणाले की, ‘पाकिस्तानने आपले ४० अतिरेकी मारले. त्यामुळे देशात प्रचंड रोष तयार झाला.’ या वक्तव्यामुळे आता दानवे यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. सोशल मीडियावर कडाडून टीका केली जात आहे.
रावसाहेब दानवे यांचा हा व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रसने आपल्या अधिकृत ट्विटर वर पोस्ट केला आहे. हेच का भाजपाचे बेगडी देशप्रेम? असा सवाल राष्ट्रवादीने आपल्या ट्विटर उपस्थित केला आहे. देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या वीर जवानांनाच भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी अतिरेकी ठरवले आहे. असे म्हणच राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा सत्ताधारी भाजपाला लक्ष केले आहे.
