मुंबई : लोकसभा निवडणूक घोषित झाल्या आणि ईशान्य मुंबई मतदारसंघात विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांच्या अडचणी वाढण्याची चिन्ह आहेत. तसेच त्यांच्या नावासोबत आणखी एका नावाची शिफारस करण्याची सूचना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने राज्यातील नेत्यांना केल्याने सोमय्या यांची उमेदवारी अडचणीत येणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, राज्यातील उमेदवारांची नावे निश्चित करण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी राज्यातील नेत्यांशी शनिवारी मध्यरात्री चर्चा केली. त्यावेळी या चर्चेत ईशान्य मुंबई मतदारसंघासाठी आणखी एक नाव सुचवावे, असे राज्यातील नेत्यांना सांगण्यात आले. त्यानुसार सोमय्या यांच्याबरोबरच आणखी एका नावाची शिफारस संसदीय मंडळाला करण्यात आली. सोमय्या यांनी गेल्या साडेचार वर्षांत सातत्याने शिवसेनेला लक्ष्य केले होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर वैयक्तिक आरोप केले होते. याचा शिवसैनिकांमध्ये कमालीचा राग आहे. युतीसाठी शिवसेनेने प्रतिसाद दिल्याने शिवसेनेला दुखाविण्याची भाजपची तयारी दिसत नाही. सोमय्या यांचे नाव मंजूर झालेल्या १६ मतदारसंघांच्या उमेदवारांमध्ये नाही, असेही भाजपच्या गोटातून सांगण्यात आले.
दरम्यान, यावेळी राष्ट्रवादीने देखील माजी खासदार संजय दीना पाटील यांना उमेदवारी देऊन तगडं आवाहन निर्माण केलं आहे. विशेष म्हणजे ईशान्य मुंबईमध्ये संजय पाटील यांच्याकडे आक्रमक कार्यकर्त्यांची फळी आणि धनशक्ती अशी दोन्ही शक्तिस्थळ आहेत. संजय पाटील यांना मानणारा मोठा मतदार वर्ग या मतदारसंघात आहेत आणि त्यात भांडुप, विक्रोळी, कांजूरमार्ग ते मुलुंडपर्यंत मनसेला मानणारा मोठा वर्ग या मतदासंघात आहे. जर मनसे कार्यकर्त्यांची फळी संजय दीना पाटील यांच्यासाठी कार्यरत झाली तर भाजपला मोठं आवाहन निर्माण होईल. तसेच त्याचा फायदा भविष्यात मनसे विधानसभेत करून घेईल अशी शक्यता आहे.
दुसरीकडे काही महिन्यापूर्वी मनसेतून शिवसेनेत गेलेले शिशिर शिंदे यांची ताकद जवळपास नसल्याचे चित्र आहे. त्याच्या शिवसेना प्रवेशानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मतदासंघात मिरवणूक काढून पेढे वाटले होते. मधल्या कार्यकाळात त्यांनी मनसेला नुकसान कसं होईल यासाठीच काम केल्याचा स्थानिक पदाधिकाऱ्यांचा स्पष्ट आरोप होता. त्यामुळे आता ते शिवसेनेत गेल्याने ते शिवसेनेविरुद्धच कुरापती करतील असं स्थानिक नेत्यांना वाटतं आहे. दुसरीकडे जर भाजपने जर किरीट सोमैया यांनाच उमेदवारी दिल्यास शिवसेनेची फळी देखील संजय दीना पाटील यांच्यासाठी पडद्याआड कार्यरत होईल असं म्हटलं जात आहे. त्यामुळे भाजपचं सावध झाल्याचं सांगण्यात येत आहे.
