मुंबई : खासदार नारायण राणे यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून जोरदार मोर्चेबांधणी करत पुत्र निलेश राणे हे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातर्फे निवडणूक लढवतील, असे जाहीर केले. परंतु आता निलेश राणे यांनी लोकसभा निवडणूक लढवू नये आणि युतीधर्म पाळावा म्हणून भाजपच्या नेतृत्वाने नारायण राणेंवर थेट दिल्लीतून दबाव आणला आहे. यामुळे खासदार नारायण राणे कोणती भूमिका घेतात, याकडे संपूर्ण कोकणाचे लक्ष आहे.

दरम्यान, नारायण राणे यांची थेट आणि जाहीर भूमिका लक्षात घेता हा मतदारसंघ राष्ट्रवादीला न सोडता काँग्रेसने स्वतःचा उमेदवार आधीच जाहीर केला आहे. तसेच नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातून विस्तवही जात नाही. भाजप-शिवसेना यांची युती झाल्याने रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ शिवसेनेकडे कायम राहणार, हे स्पष्ट झाले. परंतु युती जाहीर झाल्यावर नारायण राणे यांनी, आपले पुत्र निलेश राणे हे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातून लढतील, असे जाहीरही केले होते. राणे शिवसेनेच्या विरोधात लढतील हे लक्षात घेऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीने वेगळी चाल रचली. हा मतदारसंघ काँग्रेसकडे आहे. राणे आणि काँग्रेस यांचे संबंध लक्षात घेता राणेपुत्राला मदत करणे काँग्रेसला शक्य झाले नसते. यामुळेच हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडावा आणि आघाडीने राणे यांच्या पुत्राला मदत करावी, अशी निवडणुकीची रणनीती होती.

त्यात नारायण राणे भाजपचे खासदार असून, ते पक्षाच्या जाहीरनामा समितीचे सदस्य देखील आहेत. राणे आणि शिवसेनेत सख्य होणे अशक्यच. पण त्यांनी मुलाला उभे करू नये, असा भाजपचा प्रयत्न आहे. या दृष्टीने भाजपने राणे यांच्यावर थेट दिल्लीतून दबाव आणला आहे. भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वाने राणे यांना तसे संदेश दिल्याचे समजते. राणे यांचे अलीकडचे, ‘आपण भाजपप्रणीत रालोआचे सदस्य आहोत’ हे विधान बोलके आहे याकडे भाजपनेते लक्ष वेधत आहेत. परंतु, स्वभावाप्रमाणे नारायण राणे झुकतील असं वाटत नाही, पण भाजपाला आशा आहे की ते ऐनवेळी माघार घेऊ शकतात.

BJP party pressure on mp narayan rane to strengthen alliance in konkan