मुंबई : काल भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. नियोजित वेळेनुसार सुद्धा ही चर्चा खूप लांबल्याने सर्व काही मनासारखं आणि सकारात्मक झालं असल्याचा अंदाज राजकीय विश्लेषक बांधत आहेत.
भाजपचे वरिष्ठ नेते भेटीला येताच सत्तेत असून ४ वर्ष रुसून बसलेला वाघ अखेर नरमला आहे. त्यामुळे यापुढे शिवसेना मवाळ भूमिका घेईल असे एकूण चित्र आहे. कालच्या भेटीदरम्यान दोन्ही पक्षामध्ये अजून भेटीगाठी होतील असं समजतं आणि त्यामुळे दोन्ही पक्षामधील तणाव सुद्धा निवळेल असं एकूणच चित्र आहे.
या बैठकीमध्ये भाजप शिवसेना युतीची तयारी भाजपच्या वरिष्ठांनी दाखविली असून चेंडू शिवसेनेच्या कोर्टात टाकण्यात आला आहे. अनेक वर्ष सत्तेत दुय्यम स्थान मिळत असल्याने शिवसेनेने राजीनामा नाट्याचे अनेक प्रयोग केले होते. भाजपच्या नेत्यांवर खालच्या भाषेत तोंड सुख घेणाऱ्या नेत्यांनी काल मातोश्रीवर अमित शहांच्या स्वागतासाठी कोणतीच कसूर शिल्लक ठेवली नव्हती.
सत्तेतील तुच्छ वागणुकीला कंटाळून स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय पक्ष नैतृत्वाने घेतला होता. आम्ही झुकणार नाही असं म्हणता-म्हणता अमित शहांच्या स्वागताची जय्यत तयारी केली ती सुद्धा खास गुजराती पदार्थ पेश करत. त्यामुळे शिवसेनेकडून अमित शहांना खुश करण्याची नामी संधी शिवसनेच्या नैतृत्वाने हेरली आणि सकारात्मक चर्चा सुद्धा केली.
भाजपला सुद्धा २०१९ ची चुणूक लागली असून त्यांना सुद्धा झुकण्याशिवाय पर्याय नसून सत्ता हवी असेल तर एक या अशीच मजबुरी दोन्ही बाजूंची झाली आहे. सामान्य जनतेला अच्छे दिन येऊ देत वा नको येउदे, पण शिवसेना आणि भाजपला अच्छे दिन कसे येतील याची काळजी दोन्ही पक्ष नैतृत्व घेताना दिसत आहेत.
