पुणे : पुण्यात आज ब्राह्मण सेवा संघाच्या वतीने एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला असता दुग्धविकास मंत्री महादेव जाणकार यांनी अनेक वक्तव्य केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुख्यमंत्री फडणवीस चांगलं काम करत असून ते भविष्यात पंतप्रधान होतील असं वक्तव्य केलं आहे. ब्राह्मणांमुळे चहा विकणारा मुलगा पंतप्रधान झाला आहे. त्यामुळे ब्राह्मणांनी राजकारणात यावं आणि आरक्षण मागावं असं आवाहन जानकरांनी ब्राह्मण समाजाला केलं.
ब्राह्मण ही जात किंवा धर्म नसून तो एक व्यवस्था आहे. ज्या क्षेत्रात, जो माणूस सक्रिय होतो, तो ब्राह्मण होतो, हीच या देशाची व्यवस्था आहे असं जाणकार म्हणाले. ब्राह्मण समाजाने स्वतःला कमी न समजता देशाच्या राजकारणात आलं पाहिजे. ब्राह्मण एक असला तरी लाखोंना भारी असतो असं जाणकार म्हणाले.
भारतात ज्याला ब्राह्मणाचा हात लागतो तो इतिहास घडवतो. महात्मा गांधींचे गुरु गोपाळकृष्ण गोखले होते, डॉ. आंबेडकरांचे शिक्षक ब्राह्मण होते, महात्मा फुलेंना शाळेसाठी वाडा देणारे भिडे सुद्धा ब्राह्मण होते असं ते उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले. ब्राह्मणांसुद्धा आरक्षण मागितलं पाहिजे, या समाजाची व्यथा कोणी मांडायची? आज ब्राह्मण समाजात सुद्धा गरीब आहेत, असं ते म्हणाले.
