मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. परंतु, स्वतः शरद पवार किंवा राज ठाकरे यांच्याकडून कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना सदर युतीबाबत प्रसार माध्यमांनी विचारले असता, ‘राज ठाकरे याच्याकडे सुद्धा हजारो मतदार असून ते आघाडीसोबत आले तर फायदाच होईल’ असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. तसेच एकप्रकारे राज ठाकरे आणि मनसेचे आगामी लोकसभा निवडणुकीतील महत्व अधोरेखित केले आहे.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत जागावाटपाची चर्चा सुरु आहे का विचारलं याबाबत मला कोणतीही कल्पना नाही असे उत्तर दिले.परंतु, राज ठाकरे सोबत आले तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला नक्कीच फायदा होईल, हे नमूद केले. कारण राज ठाकरे हे नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात असून त्यांच्यामागे सुद्धा हजारो मतं आहेत, त्याचा निश्चित फायदा आघाडीला झाला असता असे त्यांनी म्हटले.

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही प्रतिक्रिया देताना म्हटले की, “राजकारणात कोणताही दरवाजा बंद नसतो. परंतु, सध्या राष्ट्रवादी आणि मनसेत ‘आघाडी’संदर्भात कोणतीही चर्चा सुरु नाही”, असे सांगितले. तर दुसरीकडे मनसेचे ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष आणि सरचिटणीस अविनाश जाधव यांनी देखील पक्षाकडून यासंदर्भात कोणतेही आदेश आलेले नाही, हे स्पष्ट केले आहे.

दरम्यान, मनसेने काही निवडक जागा निश्चित केल्या असून पक्ष त्यावर जोरदारपणे कामाला लागल्याचे वृत्त आहे. राष्ट्रवादीसाठी किंवा कोणत्याही अन्य पक्षासाठी वाट बघू नका आणि थेट कामाला लागा असे आदेश देण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यात कल्याण-डोंबिवली, ठाणे, नाशिक, यवतमाळ, मुंबई आणि औरंगाबादमधील लोकसभा मतदारसंघाचा समावेश असेल असे वृत्त आहे. त्यामधीलच २-३ जागा सर्व शक्ती आणि अर्थकारण खर्ची पाडून जिंकायच्याच असा निर्धार करण्यात आला आहे.

chagan bhujabal says mns have there own thousands of voters and it was beneficial for ncp and congress