मुंबई : आगामी लोकसभा निवडणूका केवळ अवघ्या ५ महिन्यांवर येऊन पोहोचल्या आहेत. त्यामुळे अधिकाधिक आमदारांना मंत्रिपद देऊन विभागीय बळ वाढविण्यावर भाजपचा भर आहे. त्यात मुंबई सर्वात अग्रस्थानी असल्यामुळे मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांची आगामी मंत्रिमंडळ विस्तारात लॉटरी लागण्याची शक्यता आहे असं वृत्त आहे.
त्यामुळे लवकरच राज्यातील फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे वृत्त आहे. त्यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारने मंत्रीमंडळ विस्तारासाठी नवरात्रीचा मुहूर्त ठरवल्याचे वृत्त आहे. दरम्यान, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या परदेशा दौऱ्यावर आहेत. त्यांना सुद्धा मंत्रिमंडळ विस्ताराला होकार दिला आहे. निवडणूकपूर्व या शेवटच्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला खूष करण्याचे मुख्यमंत्र्यांनी ठरवले असल्याचे समजते.
या शेवटच्या मंत्रीमंडळ विस्तारामध्ये एकनाथ खडसे यांचे कमबॅक होणार असल्याचे सुद्धा वृत्त आहे. तसे न झाल्यास एकनाथ खडसे काहीतरी धाडसी निर्णय घेतील आणि भाजपला निवडणुकीच्या तोंडावर अडचणीत आणू शकतात आणि त्यामुळेच भाजप कोणताही धोका पत्करण्याच्या मानसिकतेमध्ये नसल्याचे समजते.
काही महिन्यांपूर्वी युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी या वर्षीच्या डिसेंबर पर्यंत शिवसेना सरकारचा पाठिंबा काढेल आणि भाजपला धक्का देईल, असं विधान केलं होत. परंतु नेमकं त्याउलट स्वबळाचा नारा देणारी शिवसेना मंत्रिमंडळ विस्ताराच्या आणि डिसेंबर महिन्याच्या एक महिना आधी म्हणजे नोव्हेंबर मध्ये अजून काही मंत्रिमंडळ शिवसेनेच्या पदरात पाडून घेईल, असंच एकूण चित्र सध्या तरी आहे.
