नवी दिल्ली : आरएसएस’कडून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना कोणत्याही कार्यक्रमाचे निमंत्रण मिळालेले नाही आणि मिळाले असते तरी ते गेले नसते असं प्रदेश काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जून खरगे यांनी बुधवारी प्रसार माध्यमांपुढे स्पष्ट केले. त्यामुळे काँग्रेसने या विषयावर आता पडदा टाकला आहे.

देशातील जनता हुकूमशाहीला कंटाळली असून त्याविरोधात जनसंघर्षाचे वादळ सुरू झाले असून, तेच भाजपची सत्ता उधळवून लावेल असेही खरगे म्हणाले. भारतीय जनता पक्षाच्या चुकीच्या धोरणामुळे देशातील नागरिक त्रस्त झाले आहेत. पेट्रोल, डिझेलच्या भरमसाट किमती वाढवून सरकार कडून सर्वसामान्यांची लूट सुरु आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात सुद्धा समाजसुधारकांच्या भर रस्त्यात हत्या करणारे गुन्हेगार मोकाट आहेत. इतकेच नाही तर सरकारविरोधात बोलणाऱ्यांवर दडपशाही केली जात आहे आणि त्यांना नक्षलवादी, राष्ट्रद्रोही ठरवले जात असल्याचा आरोप सुद्धा खरगे यांनी भाजप सरकारवर केला.

सत्तेत येण्यापूर्वी भाजपने जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण केलेली नाहीत. सरकारकडून सामान्यांची केवळ फसवणूक सुरु आहे. शेतकरी, कष्टकरी, दलित अल्पसंख्यांक, महिला, विद्यार्थी असे समाजातील सर्वच घटक सरकारवर प्रचंड नाराज आहेत. इतकेच नाही तर मराठा, मुस्लिम, धनगर समाज आरक्षणाच्या मागणीसाठी थेट रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत. त्यामुळे देशातील सर्वसामान्यांच्या हक्कासाठी व महाराष्ट्राच्या हितासाठी काँग्रेस राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा सुरु करणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी यावेळी प्रसार माध्यमांना दिली. या जनसंघर्ष यात्रेची सुरुवात पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापुरातून ३१ ऑगस्ट पासून सुरु होईल असं अशोक चव्हाण यांनी सांगितले.

Congress chief Rahul Gandhi will not attend program organised by RSS says Congress spokesperson