मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेपासून वेगळं होत स्वतंत्र पक्ष स्थापन केला होता. आज मार्ग वेगवेगळे असले तरी आरोप प्रत्यारोपांच्या मार्गे अनेक गोष्टीत घडला असल्या तरी राज ठाकरे यांचे मातोश्रीवर स्थान अजून टिकून आहे असंच म्हणावं लागेल. कारण, ‘मातोश्री’वर एका डिजिटल स्क्रीनच्या माध्यमातून शिवसेनेचा संपूर्ण प्रवास दाखवण्यात आला आहे. विशेष म्हणजे यामध्ये राज ठाकरेंची अनेक छायाचित्रं आहेत. निवडणुकांची चाहूल लागताच राज ठाकरेंना पाण्यात पाहणारे त्यांची जवळीक साधण्याचे अप्रत्यक्ष प्रयत्न सुरु करतात आणि एखाद्या विषयावरून चर्चा घडवून आणतात.
२०१४ मधील निवडणुकीचा विचार करता त्यावेळीसुद्धा सामनातून टाळीसाठी हात पुढे करण्यात आला होता. शेवट पर्यंत तो हात ‘कागदीच’ राहिला आणि राज ठाकरे यांना त्यांच्या निवडणूक उमेदवारांचे अर्ज भरण्याची शेवटची वेळ आली तरी झुलवून ठेवण्यात आले. त्याचे स्पष्टीकरण स्वतः राज ठाकरे यांनी अनेक मुलाखतीत स्पष्ट केले होते. परंतु, त्याच ‘कागदी टाळीच्या’ आधारे शिवसेनेने राज ठाकरेंच्या भोवती नकारात्मक वलय निर्माण केले होते. त्यामुळे उमेदवारांमध्ये राज ठाकरेंच्या बद्दल अनेक संभ्रम निर्माण झाले होते. अर्थात शिवसेनेची ती ‘कागदी टाळीची’ खेळी निवडणुकीदरम्यान यशस्वी ठरली होती. कारण शिवसेनेतील धुरंदरांनी त्याचा प्रचारात चांगलाच उपयोग करून राज ठाकरेंना चिथावण्याचा हेतुपूर्वक प्रयत्न केला आणि तो शिवसेनेच्या पथ्यावर पडला होता. थोडक्यात सामना वृत्तपत्रातून एक बातमी छापून आणली आणि प्रसार माध्यमांमध्ये पिल्लू सोडलं गेलं होतं.
आता निवडणुका जवळ येताच, केवळ ‘कागदी-टाळी’ ऐवजी ‘डिजिटल-टाळी’ आणून समाज माध्यमांवर आणि प्रसार माध्यमांवर शिस्तबद्ध चर्चा घडवून आणण्यासाठी तर हे शिवसेनेच्या धुरंदरांनी केले नाही ना? अशी शंका व्यक्त होते आहे. मुंबई महापालिकेत मनसेच्या कार्यालयाला टाळा ठोकणाऱ्या शिवसेनेने त्याच पक्षाच्या अध्यक्षाला थेट मातोश्रीच्या प्रवेश द्वारावर आणि ते सुद्धा शिवसेनेचा एकूण राजकीय प्रवास दाखवणाऱ्या ‘डिजिटल फ्रेम’मध्ये स्थान दिल्याने वेगळीच चाणक्य नीती प्रथम दर्शनी दिसून येते आहे.
सध्या दिल्ली ते गल्ली भाजपसोबत सत्तते विराजमान असलेल्या शिवसेनेबद्दल आणि त्यांच्या विकास शून्य कारभारामुळे मतदारांमध्ये एक खदखद आहे. त्यामुळे त्यांच्या बद्दल सध्या भाजाप पेक्षाही नकारात्मक वातावरण आहे. तर दुसरीकडे मनसे बद्दल दिवसेंदिवस होकारात्मक वातावरण होताना दिसत आहे. त्यामुळे मनसेबद्दल पुन्हा काही तरी संभ्रम निर्माण करून निवडणुकीआधी २०१४ प्रमाणेच खेळी खेळली जात नाही ना अशी शंका व्यक्त करण्यात येते आहे.
निवडणुका जवळ आल्या की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोन भावंडांनी मराठी माणसासाठी एकत्र यावे अशी बोंब सुरु होते. मग केवळ फोनाफोनी पुरत सर्व काही सुरु ठेवलं जातं. त्यानंतर आम्ही हात पुढे घेतला होता, परंतु अहंकारी राज ठाकरेंनी दुसरा हात पुढे केला नाही अशा पुड्या सोडायला सुरुवात होते. वास्तविक सामान्यांना त्या फोनाफोनीची काहीच कल्पना नसते. दुसरं म्हणजे हे राजकारण खेळण्यासाठी शिवसेनेतील अनुभवी नेत्यांची स्वतंत्र यंत्रणा काम करते. तर मनसेकडे तशी यंत्रणाच नसल्याने सर्वकाही सेनेच्या पथ्यावर पडतं, असा इतिहास आहे.
असं असलं तरी हे सर्व प्रत्यक्ष अनुभवणारे राज ठाकरे या मृगजळावर किती विश्वास ठेवतील हाच प्रश्न आहे. परंतु शिवसेनेची प्रत्येक खेळी ते सध्या त्यांच्यावरच उलटवतील असं एकूण राज ठाकरे यांचं सध्याचं राजकारण दिसत आहे.
