मुंबई : रविवारी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर अव्नी वाघिणीला ठार मारण्याचे आदेश दिल्याबद्दल एकावर एक ट्विट करत टीका केली होती. त्यानंतर, आम्ही अव्नी वाघिणीला नाईलाजाने मारल्याचे राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीयमंत्री मेनका गांधी यांना प्रतिउत्तर देताना म्हटले आहे. त्यामुळे मनेका गांधी यांना अजून सविस्तर माहिती माहित नाही असं वनमंत्री म्हणाले. दरम्यान, वाघिणीला मारण्याचा निर्णय हा राष्ट्रीय वाघ संरक्षण प्राधिकरणाने घेतला आहे. तसेच वाघिण काय वनखात्याच्या कर्मचाऱ्यांची शत्रू नव्हती, असं सुद्धा म्हटलं आहे.
तसेच अव्नीला मारण्याचा आदेश ५ जणांचा नाहक बळी गेल्यानंतरच दिला होता. दरम्यान, प्राणीप्रेमींनी यावर स्थगिती आणली होती. परंतु, अव्नीने २ वर्षात तब्बल चौदा जणांना भक्ष केल्यानंतर यावर तातडीने निर्णय घेणे भाग होते. दरम्यान, शोध पथकाकडून वाघिणीला आधी बेशुद्ध करण्यात आले, परंतु तिने पुन्हा पलटवार केला म्हणून नाईलाजाने तिला जागेवरच ठार करावे लागले, असे वनमंत्र्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणी फडणवीसांकडे तक्रार करण्यापेक्षा ५ न्यायमूर्तींची समिती नेमावी असा सल्ला सुद्धा देण्यात आला आहे.
