कराड : भारतीय जनता पार्टीने सामान्यांना विकासाची दाखविलेली स्वप्ने पूर्णपणे भंग पावल्याने ते सामान्यांचे मन विचलित करण्यासाठी सत्ताधारी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीने पुन्हा अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला आहे. असे असले तरी रामाच्या नावावर भविष्यात पुन्हा मते मिळणार नाहीत,’ असं पृथ्वीराज चव्हाण यांनी मत व्यक्त केलं आहे.

दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड येथे त्यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन केले. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी प्रसार माध्यमांशी मुक्त संवाद साधला. यावेळी त्यांच्या सोबत आमदार आनंदराव पाटील, आमदार विश्वजित कदम, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे, शहराध्यक्ष आप्पा माने, अशोकराव पाटील, सुनील पाटील आदी नेते मंडळी उपस्थिती होती.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, “दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी राज्याला प्रगतिपथावर घेऊन जाण्याचे काम केले आहे. तसेच त्यांच्या प्रगत विचारांची जोपासणा करणे हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल असं ते म्हणाले. पुढे राज्यातील बहुचर्चित मराठा आरक्षणाच्या मुद्यावर बोलताना ते म्हणाले की, “फडणवीसांनी मराठा आरक्षणाचा निर्णय घेतल्यास आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. तसेच त्याचे संपूर्ण श्रेय फडणवीसांना मिळाले तरी आमची काहीच हरकत नाही; केवळ या प्रश्नी मराठा समाजाची फसवणूक करू नका, अन्यथा त्या समाजाचा मोठा उद्रेक होईल,’ असा इशारा सुद्धा त्यांनी भाजप-शिवसेना सरकारला यावेळी दिला.

Former CM Prithviraj chavan criticised shivsena and bjp over ram mandir politics