मुंबई : निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना आक्रमक झाली असून विकासापासून लोकांचं लक्ष हटविण्यासाठी सत्तेत राहून केंद्र आणि राज्यातल्या सरकारला टीका करत असून आता लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राम मंदिराच्या भावनिक विषयाला हात घातला आहे. त्यामुळे भाजपला अडचणीत आणण्यासाठी आणि उत्तर भारतीय समाजातील लोकांना शिवसेनेकडे आकर्षित करण्यासाठी उद्धव ठाकरे २५ नोव्हेंबरला उत्तर प्रदेशात म्हणजे अयोध्येला जाणार आहेत असं राजकीय विश्लेषकांना वाटतं आहे.
शिवसेनेच्या ५२व्या मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. पण उद्धव ठाकरेंच्या भाषणात संयत स्पष्ट दिसत होता. लोकसभा किंवा विधानसभेच्या निवडणुकीत युती तोडण्याबाबत त्यांनी कोणताही उल्लेख केला नसला, केवळ भाषणात बोलताना ‘काय ते परत परत बोलायचं’ असं म्हणत वेळ मारून घेतली. तरी आम्ही सत्तेत हिंदुत्वासाठीच आहोत, असे सांगत सामान्यांच्या प्रश्नांवर सरकारशी संघर्ष सुद्धा कायम राहील, असे सुद्धा भाषणात म्हटलं.
‘अच्छे दिन’चे नारे देत सत्तेवर आलेल्या सरकारने नंतर त्या सर्व घोषणा म्हणजे ‘जुमलेबाजी’ होती, असे निर्लज्जपणे जाहीर केले. मग आता राममंदिर हासुद्धा जुमलाच होता का, अशी बोचरी टीका सुद्धा त्यांनी केली. उत्तर प्रदेश म्हणजे अयोध्येतील राममंदिर रखडल्याचा जाब सरकारला विचारण्यासाठी मी २५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार असल्याची घोषणा सुद्धा उद्धव ठाकरे यांनी भाषणादरम्यान केली आहे. तसेच पुढे बोलताना देशाच्या पंतप्रधानपदी बसल्यापासून गेल्या साडेचार वर्षांत नरेंद्र मोदी एकदाही अयोध्येला का फिरकले नाहीत, असा खडा सवाल सुद्धा त्यांनी केला आहे.
