मुंबई : आज पार पडलेल्या राज्य सरकारी कर्मचारी समन्वय संघटनांच्या बैठकीत १७ लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी ३ दिवसीय संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या या संपाचा पहिला दिवस असणार आहे, त्यामुळे सामान्यांची उद्या गैरसोय होण्याची शक्यता आहे.

या संपात मंत्रालय कर्मचारी, जिल्हा परिषद, नगरपालिका कर्मचारी तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होणार आहेत. राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांची वारंवार आश्वासनं देऊन केवळ फसवणूक केल्याची कर्मचाऱ्यांची भावना आहे. राज्यात मोठ्या प्रमाणावर पद रिक्त असताना सरकारने भरती प्रक्रिया थांबवली आहे आणि सातवा वेतन आयोग लागू करावा या कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत.

पहिल्यांदा सातवा वेतन आयोग दिवाळीच्या मुहूर्ताला देण्याचा निर्णय झाला असताना, पुन्हा मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय लांबणीवर टाकल्याने कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड राग आहे आणि त्यामुळे तडकाफडकी संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Maharashtra State government employees will go on three days strike from tomorrow