मुंबई : औरंगाबाद पासून सुरु झालेल मराठा आरक्षणाचं रुद्र रूप संपूर्ण राज्यभर पसरत आहे. त्यात आज राज्याची राजधानी मुंबई सकट ठाणे, नवी मुंबई आणि अनेक महत्वाच्या शहरांमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे. त्याचे पडसाद सकाळी १० वाजल्यापासून उमटू लागले आहेत.
आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी आक्रमक झालेल्या मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या मुंबई, ठाणे बंदचा फटका आज बसेस, खासगी वाहन आणि लोकल गाड्यांनाही बसला. मुंबईतील जोगेश्वरी स्थानकात आंदोलक रेल्वे रुळांवर उतरल्याने काही वेळेसाठी पश्चिम रेल्वेवरील वाहतूक खोळंबली. मात्र, अवघ्या काही वेळेतच पोलिसांनी आंदोलकांना रुळावरुन हटवले असून आता पश्चिम रेल्वेवरील वाहतूक सुरळीत सुरु आहे.
सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी पुन्हा काही अघटित घडणार नाही याची शाश्वती देणे कठीण आहे असं मागील एक दोन दिवसातील वातावरण सांगत आहे. तरीसुद्धा पोलीस यंत्रणा जागोजागी योग्य ती खबरदारी घेत असल्याचे चित्र आहे.
