भोपाळ : कॉम्पुटर बाबा, नर्मदानंद महाराज, हरिहरानंद महाराज, पंडित योगेंद्र महंत आणि भय्यू महाराज या पाच अध्यात्मिक गुरूंना मध्य प्रदेश विधानसभा निवडणुका जवळ आल्याने भाजप सरकारने राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिला आहे.
मध्य प्रदेश सरकारने तसे आदेशच दिले आहेत. मध्य प्रदेश सरकारच्या सामान्य प्रशासनातील अतिरिक्त सचिव के के कटारिया यांनी या बाबतचे आदेश जारी केले आहेत. त्यात कॉम्पुटर बाबा, नर्मदानंद महाराज, हरिहरानंद महाराज, पंडित योगेंद्र महंत आणि भय्यू महाराज यांचा समावेश आहे. नर्मदा नदी संवर्धन समितीचे सदस्य म्हणून त्यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्यात आल्याची माहिती आहे.
काँग्रेसने याला केवळ निवडणुकीची रणनीती म्हटले आहे. या सर्व गुरूंना समाजात असलेला आदर विचारात घेऊन केवळ विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवराज सिंह सरकारने हा निर्णय घेतल्याचा आरोप केला आहे. तर नदी संवर्धन करण्यात लोकसहभाग वाढावा म्हणून हा आम्ही हा निर्णय घेतल्याचे उत्तर भाजप प्रवक्ते रजनीश अग्रवाल यांनी दिलं आहे.
