सावंतवाडी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. मनसे कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या भेटी-गाठी तसेच सविस्तर चर्चेवर त्यांनी भर दिला आहे. येत्या २ महिन्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याची कार्यकारीणी तयार करा आणि जोरदार पणे पक्षाचा विस्तार करा. कारण आगामी काळातील निवडणूक आपण स्वबळावर लढणार असल्याचं त्यांनी घोषित केलं.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांची तसेच कार्यकर्त्यांची एका हॉटेलमध्ये गुप्त बैठक घेऊन मनसेच्या कार्यकर्त्याशी संवाद साधला तसेच त्यांच्या अडचणी समजून घेण्याचा प्रयत्नं केला. या बैठकीत त्यांच्या सोबत माजी आमदार तसेच सरचिटणीस परशुराम उपरकर आणि शिरीष सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.

त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना राज ठाकरे म्हणाले की, आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणूक मनसे स्वबळावर लढणार आहे. त्या दृष्टीने पक्ष बांधणीवर भर देण्यात आला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अगदी बुथपर्यत रिक्त असलेल्या कार्यकारिणी तात्काळ नेमण्यात याव्यात अशा सूचना त्यांनी पधाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत पक्ष पोहोचण्याचा प्रयत्न करून समाज माध्यमांचा चांगला उपयोग करा असं सुद्धा त्यांनी सूचित केलं आहे.

निवडणुकीत विजय हा केवळ पैशामुळेच मिळतो असं नाही. येणाऱ्या काळात स्थानिकांच्या मूळ समस्या सोडविण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्नं करावेत आणि सामान्य लोकांपर्यंत पक्ष पोहोचवा असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना केलं. राज ठाकरे यांच्या सोबत झालेल्या बैठकीला जिल्हाध्यक्ष धिरज परब, राजन दाभोलकर, चैताली भेंडे, श्रेया देसाई दत्ताराम गावकर, संदिप खानविलकर, अभिमन्यू गावडे, सुधीर राउळ, गुरूदास गवंडे, आशिष सुभेदार, मायकल लोबो, शशिकांत आईर, विनायक सावंत, नरेश देवूलकर, आनंद मयेकर, प्रमोद तावडे, ओकार कुडतरकर, विजय सावंत, परशुराम परब, आबा चिपकर, धनंजय शिरोडकर, राजा सावंत, आशिष जोशी हे पदाधिकारी उपस्थित होते.

MNS chief raj thackeray announced that they will not make any alliance with any other party in upcoming Elections