नाशिक : मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडसह ५ राज्यांमध्ये झालेला भारतीय जनता पशाचा पराभव हा सामान्य जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील राग आहे असं मत महाराष्ट्र सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. कारण लोकांचा तो रागच मतांमधून व्यक्त झाला आणि भाजपला पराभवाचा सामना करावा लागला असं राज ठाकरे पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले.
तसेच मोदींनी देश जितका खड्ड्यात घातला आहे, त्यापेक्षा जास्त कुणी सुद्धा घालू शकत नाही. अगदी मायावतींनी ठरवलं तरी त्यासुद्धा ते करू शकत नाहीत,’ अशी खरमरीत टीका मनसे अध्यक्षांनी केली आहे. आज नाशिक येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी संवाद साधला आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीवर विचार मांडले. तसेच महाराष्ट्रासह देशातील राजकीय परिस्थितीवर त्यांनी आजच्या पत्रकार परिषदेत भाष्य केलं.
दरम्यान, पुढे बोलताना ते असे म्हणाले की, ‘शिवसेना-भाजपच्या सभांची होणारी गर्दी आटली आहे. लोकांचा त्यांच्यावरचा विश्वास उडत चालल्याचंच हे लक्षण आहे, असं स्पष्ट करताना, ‘शिवसेना-भाजपवाले हे आधीच्या काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा सुद्धा बेकार निघाले,’ अशी खरमरीत प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. तसेच हनुमानाच्या जातीवरून सध्या राजकीय नेते करत असलेल्या अर्थशून्य चर्चेचा सुद्धा राज ठाकरे यांनी समाचार घेतला. त्यावर उपहासात्मक प्रतिक्रिया देताना राज ठाकरे म्हणाले की, ‘हनुमान उडत असल्यानं निरनिराळ्या देशात जात असणार. त्यामुळं ते सगळ्यांना आपला वाटत असणार, असा उपहासात्मक टोला त्यांनी हनुमानाची जात काढणाऱ्यांना लगावला आहे.
