मुंबई : मुंबई महापालिकेने लादलेल्या जाचक अटींमुळे गणपती मंडळांना खूप अडचणींचा सामना करावा लागत असल्याने संपूर्ण प्रकरण राज ठाकरे यांच्या दरबारी गेले आहे. आज मनसे अध्यक्ष स्वतः गिरगावच्या खेतवाडीत पोहचले आणि गणेश मंडळांच्या समस्या समजून घेतल्या आहेत.
त्यामुळे आता राज ठाकरेंसोबत मुंबईतील प्रमुख गणेश मंडळ थेट शिवसेना प्रणित मुंबई महापालिकेविरुद्ध दंड थोपटण्याच्या तयारीत आहेत असच म्हणावं लागेल. कारण गिरगावमध्ये मंडप उभारण्यासाठी मुंबई महापालिकेनं मंडळांना परवानगी नाकारली आहे. त्यामुळे मुंबई मनपा मंडप बांधण्यासाठी परवानगी देत नसल्याच्या गणेश मंडळांच्या तक्रारी आहेत. मनसे अध्यक्षांनी त्या भागाची आज स्वतः भेट देऊन पाहणी केली आणि गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या व्यथा समजून घेतल्या.
जर गणपती मंडप लहान स्वरूपाचे बांधायचे तर मग गणेश मुर्त्या कशा आणायच्या असा प्रश्न इथल्या मंडळांना पडला आहे. संपूर्ण विषय समजून घेतल्यावर तुम्ही काळजी करू नका, असं म्हणत राज ठाकरे यांनी गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना आश्वस्तही केलं. त्यामुळे आता राज ठाकरे कोणता आक्रमक पवित्र घेतात किंवा इतर कोणता कायदेशीर तोडगा काढतात ते पाहावं लागेल.
