मुंबई : प्लास्टिक बंदी लागू झाल्यानंतर पर्यावरण मंत्र्यांनी चारच दिवसात प्लास्टिक बंदीतून किराणा दुकानदारांना दिलासा दिल्याने मनसेने रामदास कदमांवर ‘प्लास्टिकच्या पिशवीतून खाऊ पोहोचला का? असा खोचक सवाल करत प्रश्न विचारला आहे आणि प्लास्टिकमधून खाऊ पोहोचल्यानेच रामदासाचा ‘कदम’ लगेचच घसरला, असा सणसणीत खोचक टोलाही मनसेचे प्रवक्ते अविनाश अभ्यंकर यांनी लगावला आहे.
सरकारने कोणताही पर्याय उपलब्ध न करता प्लास्टिक बंदी अंमलात आणल्याने सर्वसामान्य आणि दुकानदारांमध्ये संभ्रमावस्था निर्माण होती. अनेक किराणा वस्तू तसेच रोजचे खाद्यपदार्थ सुद्धा ग्राहकांना कागदामधून बांधून देण्याची वेळ आली होती. मनसेने प्लास्टिक बंदीला विरोध न करता नेमक्या सरकारच्या याच त्रुटींवर बोट ठेवलं होत.
त्यानंतर सुद्धा प्रतिक्रिया देताना पर्यावरण रामदास कदमांनी आता माघार नाही अशी प्रतिक्रिया दिली होती. परंतु लगेचच दुसऱ्या दिवशी ही बंदी किराणा दुकानदारांना आणि इतर छोट्या दुकानदारांसाठी शिथिल करण्यात आल्याने मनसेला आयतीच संधी मिळाली आहे. पर्यावरण मंत्र्यांनी प्लास्टिक बंदी यशस्वी करणार म्हणजे करणार असं जाहीर करून एक एक नियम शिथिल करण्यास सुरुवात केल्याने पक्षाची राजकीय अडचण होण्याची चिन्ह आहेत.
नव्या नियमानुसार पाव किलो व त्यापेक्षा अधिक वजनाच्या वस्तू बांधून देण्यासाठी प्लास्टिक पिशव्या देता येतील, पण त्या परत घेऊन त्याची विल्हेवाट करण्याची जबाबदारी दुकानदाराची असेल, असा निर्णय जाहीर करण्यात आला. शेवटी एक एक बंदी उठवायला पर्यावरण खात्याने सुरुवात सुरु केली आहे. तसेच आगामी निवडणुकीसाठी निधी गोळा करण्यासाठी प्लास्टिकबंदी केली गेली नाही ना अशी शंका पत्रकार परिषदेत उपस्थित केली होती. त्यामुळेच मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर यांनी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यावर टीकास्त्र सोडले. प्लास्टिकच्या पिशवीतून खाऊ पोहोचला की काय?, म्हणून रामदासाचा ‘कदम’ लगेचच घसरला, अशी खोचक टीका त्यांनी केली.
