मुंबई : शिवसेना भवनाबाहेर मनसेने उद्धव ठाकरेंना पोस्टरबाजीने शुभेच्छा दिल्या आहेत. परंतु त्यासोबत १० प्रश्न सुद्धा विचारले आहेत आणि शिवसेनेला अडचणीत आणण्याचा प्रयत्नं केला आहे. दसरा मेळाव्यात शिवसेना पक्ष प्रमुखांनी २५ नोव्हेंबर रोजी अयोध्येला जाण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर त्यांच्यावर अनेक बाजूने टीका सुद्धा करण्यात येत आहे. त्याचाच फायदा मनसे सुद्धा उचलत आहे.
सामान्य माणसं भाजप आणि शिवसेनेच्या राजवटीत ज्या मूळ समस्यांनी होरपळून निघाली आहेत, त्याचाच धागा पकडत मनसेने शिवसेनेला लक्ष केलं आहे. त्यात मध्ये प्रश्न विचारताना म्हटलं आहे की, या अयोध्या वारीने महाराष्ट्राचे रस्ते खड्डे मुक्त होणार का ?, महागाई कमी होणार का ?, शेती मालाला भाव मिळणार का ? महाराष्ट्रातील महिला सुरक्षित होणार का? बेरोजगारांना रोजगार मिळणार का? महाराष्ट्रातला दुष्काळ संपणार का? महापालिकेतील भ्रष्टाचार संपणार का? आणि खिशातले राजीनामे बाहेर पडणार का ? असे प्रश्न मनसेने बॅनरद्वारे शिवसेना भवनाच्या समोर लावले आहेत.
त्यामुळे स्थानिक नागरिकांचे आणि पादचाऱ्यांचा नजर अगदी सहज त्या बँनरवर पडत आहे आणि लोकांना हसू फुटत आहे असं चित्र पाहायला मिळालं. त्यामुळे एनडीएच्या राजवटीत सामान्यांना भेडसावणारे प्रश्न महत्वाचे की अयोध्यावाऱ्या असा प्रश्न उपस्थित होत आहे.
