मुंबई : मुंबई महापालिकेने गिरगावमध्ये मंडप उभारण्यासाठी गणेश मंडळांना परवानगी नाकारली होती. मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता असून सुद्धा गिरगावमध्ये मंडप उभारण्यासाठी महापालिकेकडून परवानग्या मिळत नसल्याने गणेश मंडळांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे मदतीसाठी धाव घेतली होती.
गणेश मंडळांशी झालेल्या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी गिरगावातील गणेश मंडळांना भेट देऊन तुम्ही बिनधास्त मंडप बांधा आणि गणेशोत्सव साजरा करा असा थेट आदेश गणेश मंडळांना दिल होता. त्यात मनसेने शिवसेनेला धारेवर धरले असून तशी मुंबईमध्ये पोस्टरबाजी थेट शिवसेना भवनासमोर सुरु केली आहे. त्यावर शिवसेनेला लक्ष करताना राज ठाकरे यांनी म्हटलं आहे की, ‘अयोध्याचं मंदिर नक्की बांधा पण त्याच्याआधी मुंबईत गणपती मंडप बांधण्यासाठी परवाणगी द्या.’
काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी सामना’ला दिलेल्या मॅरेथॉन मुलाखतीत म्हटलं होत, ‘मला वाराणसीला जाऊन गंगापूजन करायचे आहे आणि अयोध्येत जाऊन रामलल्लाचे दर्शन घ्यायचे आहे’. त्याचाच धागा पकडून मनसेने शिवसेनेला धारेवर धरलं म्हटलं आहे ‘अयोध्याचं मंदिर नक्की बांधा पण त्याच्याआधी मुंबईत गणपती मंडप बांधण्यासाठी परवाणगी द्या’. आता यावर शिवसेना काय प्रतिउत्तर देणार ते पाहावं लागेल.
