नवी मुंबई : नुकताच बांधला गेलेला सायन-पनवेल हायवेची एकाच पावसाने अक्षरशा दुर्दशा झाली आहे. खड्ड्यांच प्रमाण इतकं भयंकर वाढलं आहे की तासंतास प्रवाशांचा ट्रॅफिकमध्ये खोळंबा होत आहे. त्यात सरकारला सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणावर पडलेले खड्डे दिसेनासे झाले आहेत. त्यामुळे अखेर राज्य सरकारच्या पीडब्लूडी अर्थात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तुर्भे कार्यालयाची मनसेच्या नवी मुंबईतील महाराष्ट्र सैनिकांनी तोडफोड केली असून झोपलेल्या सरकारी यंत्रणेला जाग आणण्याचा आक्रमक प्रयत्नं केला आहे.

सायन पनवेल हायवे हा वाहतुकीसाठी खूप महत्वाचा समाजाला जातो आणि त्याच नवीन रस्त्याची एकाच पावसाने केलेली दुर्दशा प्रत्येक प्रवासी डोळ्याने बघून राग व्यक्त करत आहे. त्यामुळे या मोठ्या प्रमाणावरील खड्ड्यांचा परिणाम असा की वाहतूक खूपच धिम्यागतीने होत असून प्रवाशांचा तासंतास या प्रवासात खोळंबा होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये सुद्धा प्रचंड नाराजी आहे. त्यात सरकारी यंत्रणा सुद्धा कोणतीही जवाबदारी स्वीकारायला तयार नसल्याने हे खड्डे बुजवणार तरी कोण असा प्रश्न पडला असताना, आज अखेर झोपलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग करण्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी तुर्भे कार्यालयावर तोडफोड करत सरकारविरोधी घोषणाबाजी केली.

यात नवी मुंबईमधील नितीन खानविलकर, नितीन चव्हाण, राजू खाडे, विशाल भिलारे, श्याम ढमाले या महाराष्ट्र सैनिकांनी सहभाग घेतल्याचे समजते. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिल की,’जर सरकारला रस्त्यांवरील खड्डे दिसत नसतील तर सामान्य जनतेसाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांची आंदोलनं ही दिसणारच’. माझे कार्यकर्ते सामन्यांच्या प्रश्नांसाठी झोपलेल्या सरकारला जागं करत आहेत असं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांची पाठराखण केली आहे.

मागील आठवडाभर झालेल्या पावसाने मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली या महापालिकांच्या क्षेत्रातील रस्त्यांची अक्षरशः दुर्दशा झाली आहे आणि त्या खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांनी अनेकांनी प्राण गमावले आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या मनात सुद्धा सरकारविरुद्ध चीड असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

MNS workers from Navi Mumbai have damaged Turbhe PWD office