नवी दिल्ली : भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीए’च्या एकूण घटकपक्षांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. तर जे आहेत ते स्वतःची वेगळी भूमिका घेताना दिसत आहेत आणि स्वतःला भारतीय जनता पक्षाच्या अजेंड्यापासून वेगळं ठेवत आहेत. एनडीए’चा भाग असलेल्या लोक जनशक्ति पार्टीने स्वतःची भूमिका मांडली आहे. केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे चिरंजीव चिराग पासवान यांनी भारतीय जनता पक्षाला राम मंदिराच्या मुद्यावरून वेगळे पाडले आहे. राम मंदिर हा केवळ एका पक्षाचा अजेंडा आहे, तो संपूर्ण एनडीएचा अजेंडा नाही, अशा शब्दात त्यांनी भाजपाला अप्रत्यक्ष रित्या सुनावले आहे अशी चर्चा रंगली आहे.

भारतीय जनता पक्षाने राम मंदिराचे बांधकाम आणि हनुमानाची जात या मुद्द्यांवरुन लोकांमध्ये संभ्रम निर्माण करु नये, त्यांनी केवळ विकासाच्या मुद्द्यावरच भर द्यावा, असा थेट सल्ला सुद्धा त्यांनी भारतीय जनता पक्षाला दिला आहे. चिराग पासवान हे जमूई मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले आहेत. चिराग पासवान यांनी इंडियन एक्स्प्रेसला मुलाखत दिली त्यावेळी त्यांनी ही भूमिका मांडली.

राम मंदिरासाठी अध्यादेश काढल्यास तुमची एनडीएचा घटक पक्ष म्हणून नेमकी भूमिका काय असेल, असा प्रश्न सुद्धा चिराग पासवान यांना विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना ते म्हणाले, राम मंदिरासाठी अध्यादेश काढण्यासंदर्भात भाजपाने मित्रपक्षांशी अद्याप कोणतीही चर्चा केलेली नाही. राम मंदिरासंदर्भात न्यायालयाचा जो निर्णय असेल तो आम्हाला पूर्णपणे मान्य असेल, सध्या तरी भारतीय जनता पक्ष त्याबाबत अध्यादेश काढणार नाही असे दिसत असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, मोदींनी तरुणांसाठी रोजगार आणि शेतकरी याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. २०१४ मध्ये सुद्धा मोदी देशातील तरुणांमुळेच सत्तेवर विराजमान झाले होते. आणि त्यात शेतकऱ्यांनी सुद्धा मोलाची साथ दिली होती, याची आठवण पासवान यांनी म्हटले आहे.

mp Chirag paswan clear party stand over ram temple during interview