मुंबई : सध्याची शिवसेना ही पूर्वीची बाळासाहेबांची शिवसेना राहिलेली नाही. केवळ मराठीच्या नावाने भावनिक राजकारण करायचा पण त्यांच्यासाठी शिवसेनेकडून काही सुद्धा केले जात नाही हे वास्तव आहे अशी टीका माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी थेट शिवसेनेचं नाव घेऊन केली आहे. यांनी मराठी माणसासाठी कधीच काही केलं नाही, त्यामुळे यांच्या कार्यकाळातच मुंबईतून मराठी माणूस हद्दपार झाला असं ते टीका करताना म्हणाले.
काल महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा मुंबई विभागीय मेळावा वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात पार पडला. या मेळाव्याला मुंबईतील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली होती. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना नारायण राणे यांनी आवेशपूर्ण भाषणाने कार्यकर्त्यांमध्ये चेतना जागविण्याचा प्रयत्नं केला आणि त्याला कार्यकर्त्यांचा तुफान प्रतिसाद मिळाला.
दरम्यान शिवसेनेवर तुफान टीका करताना नारायण राणे म्हणाले की, महाराष्ट्राच्या सरकारमध्ये सत्तेत राहायचे आणि स्वतःच्या सत्तेतील सहकारी मित्र पक्षावर टीका करायची. नंतर स्वबळावर लढण्याच्या घोषणा द्यायच्या हे असले उद्योग शिवसेनेला शोभत नाही. जर उद्धव ठाकरे स्वबळाची भाषा करता, तर मग सत्तेतून बाहेर का पडत नाहीत, असा खणखणीत सवाल महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, खासदार नारायण राणे यांनी विचारला त्यावर कार्यकर्त्यांनी तुफान टाळ्यांचा कडकडाट केला.
मुंबई जिंका, महाराष्ट्र आपोआप हातात येईल; असं थेट त्यांनी कार्यकर्त्यांना केलं आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या मुंबई अध्यक्षपदी राजेश हाटले यांची निवड केली. तसेच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची ताकद मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात वाढविण्यासाठी सर्व ताकदीनिशी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहनही त्यांनी केले. मुंबई पदवीधर मतदारसंघातून राजू बंडगर हे विजयी होतील आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे पहिले आमदार ठरतील, असा विश्वासही नारायण राणे यांनी व्यक्त केला आहे.
