मुंबई : राज्य सरकारनेही दूध उत्पादक शेतकर्‍यांना प्रतिलिटर ५ रुपये दर द्यावा या मागणीसाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून मुंबईचा दूध पुरवठा रोखण्यात येणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात ५ दुधाच्या ५ गाड्या फोडल्याची बातमी आहे. त्यामुळे हा मुद्दा पेटण्याची शक्यता आहे.

गोवा आणि कर्नाटक राज्यांच्या धर्तीवर हा भाव द्यावा अशी तीव्र मागणी केली जात आहे. आज सकाळी विठ्ठलाला दुग्धाभिषेक घालून खासदार राजू शेट्टी यांनी या आंदोलनाला सुरूवात केली आहे. राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला गोकूळनेही जाहीर पाठिंबा देत संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील दूध संकलन बंद करण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. आंदोलकांच्या मागण्यांवर जोपर्यंत महाराष्ट्र सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही असं स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे मुंबईमध्ये दुधाचा तुटवडा जाणवू शकतो असं म्हटलं जात आहे.

राज्य सरकारने हे आंदोलन मोडून काढण्यासाठी कार्यकर्त्यांच्या धरपकड सुरु केल्या आहेत. दरम्यान दुधाला दरवाढ देण्यात आली असून दूध संघांनी त्याप्रमाणे उत्पादक शेतकऱ्यांना देण्याचे मान्य केले. परंतु त्यानंतर सुद्धा आंदोलन होणार असेल, तर रासप’चे कार्यकर्ते सुद्धा मैदानात उतरतील, असा सूचक इशारा पशुसंवर्धन-दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी दिला आहे. परंतु मुंबईला दुधाची कमतरता भासणार नाही, असाही निर्वाळा सरकारकडून देण्यात आला आहे.

Mumbai Milk supply may impact due to chakka jam andolan of Swabhimani Shetakari Sanghatan