राळेगणसिद्धी : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मागील ५ वर्षांत तब्बल ३८ वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठविल्यावर अखेर त्यांनी प्रथमच अण्णांच्या पत्राला केवळ एका ओळीत उत्तर देत त्यांची अप्रत्यक्ष हेटाळणीच केल्याचे म्हटले जात आहे. त्यात अण्णांना उत्तर देताना म्हटलं आहे की, ‘तुमचे १ जानेवारीचे पत्र मिळाले. आपणास शुभेच्छा’ केवळ एवढाच एका ओळीचा उल्लेख संबंधित पत्रात करण्यात आला आहे. परंतु, अण्णांनी विचारलेल्या शेतकऱ्यांच्या, लोकपाल नियुक्ती तसेच प्रत्येक राज्यात लोकायुक्त कायदा याबाबत उत्तर देण्याचे नरेंद्र मोदींनी स्पष्ट टाळले आहे.

आज अण्णांच्या उपोषणाचा सलग चौथा दिवस असून त्यांचं वजन जवळपास साडेतीन किलोने घातल्याचे डॉक्टरांच्या तपासणीत पुढे आले आहे. दरम्यान, अण्णांच्या उपोषणाच्या चौथ्या दिवशी सुद्धा केंद्र आणि राज्य सरकारकडून कोणताही अधिकृत संपर्क करण्यात आलेला नाही हे विशेष म्हणावे लागेल. तसेच केंद्र सरकार त्यांच्या मार्गाने जाईल आणि आम्ही आमच्या मार्गाने आंदोलन करू, असे अण्णा हजारे यांनी उपोषणाच्या चौथ्या दिवशी प्रसार माध्यमांना कळवले आहे.

दरम्यान, केंद्रात काँग्रेसप्रणित सरकार जाऊन नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेवर आल्यापासून अण्णा हजारे यांनी शेतकऱ्यांसाठी स्वामिनाथ आयोगाची अंमलबजावणी व्हावी, लोकपाल कायद्याची अंमलबजावणी व्हावी, प्रत्येक राज्यात लोकायुक्त कायदा व्हावा या मागण्या करीत तबल्ल ३८ वेळा पंतप्रधान कार्यालयाशी पत्र व्यवहार केला होता. परंतु, मोदींनी हजारे यांच्या सर्व पत्रांकडे दुर्लक्ष करण्याचे धोरण अवलंबविले होते. परंतु, २५ जानेवारी रोजी प्रथमच पंतप्रधानांनी हजारे यांच्या पात्राला उत्तर दिले आहे. जे अण्णांना शुक्रवारी प्राप्त झाले. परंतु, त्यात अण्णांच्या एकाही मागणीवर उत्तर देणे मोदींनी साफ टाळल्याचे वृत्त आहे.

हे आहे ते मोदींच पत्र;

narendra modi reply to anna hazares letter just in one line and never answer on any question