पुणे : आघाडी संदर्भात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सोबत आपल्या ३ बैठका पूर्ण झाल्या असल्याचा खुलासा राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार यांनी ‘द हिंदू’ ला दिलेल्या एका मुलाखतीत केला आहे. त्यामुळे शरद पवार हे आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी जोमाने कामाला लागले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राहुल गांधींसोबत झालेल्या बैठकांमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आघाडी करण्याचा निर्णय झाला असून येत्या आठवड्याभरात दोन्ही पक्षांमधील जागावाटप ठरणार असल्याचे पवारांनी स्पष्ट केले आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि एनसीपी हे दोन्ही पक्ष त्यांचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार निवडणुकीआधी जाहीर करणार नसल्याचेही दोन्ही पक्षादरम्यान ठरल्याचे त्यांनी स्पष्ट केलं.

आगामी निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना एकत्र येणार की नाही हे सध्या सांगणं कठीण आहे असं सुद्धा पवार म्हणाले. परंतु भाजप व शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शेतकरी कामगार पक्ष, रिपब्लिकन पक्ष यांनाही सोबत घेण्याचा प्रयत्न केला जाईल. परंतु प्रकाश आंबेडकर जी भाजप विरोधात आघाडी उभी करण्याच्या तयारीत आहेत, त्यासाठी मी स्वतः उपस्थित राहणार नसून आमचे राज्य पातळीवरील नेते त्यात प्रतिनिधित्व करतील असं सुद्धा पवारांनी मुलाखती दरम्यान स्पष्ट केलं.

पुढे नाणार’बाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना पवार म्हणाले की, नाणार प्रकल्प व समृद्धी महामार्ग अशा प्रकल्पांबाबत महाराष्ट्र सरकारने स्थानिक जनतेला विश्वासात घेतले नसून ते लोकशाहीला धरून नाही, अशी प्रतिक्रिया पवारांनी दिली.

NCP and Congress will make alliance for upcoming lok sabha and state assembly election