मुंबई : लोकसभा निवडणूक जवळ आल्याने पुन्हा राम मंदिराचा भावनिक मुद्दा उचल खाण्याची शक्यता आहे. मागील अनेक वर्षांपासून भाजप आणि शिवसेनेने या मुद्याचा निवडणुकीत आधार घेऊन फायदा करून घेतला, तरी राम मंदिर अजून जैसे थे स्थितीत आहे. शिवसेना सुद्धा आता लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राम मंदिराच्या मुद्याला पुन्हा हात घालून भाजपवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे असं वाटत.

शिवसेना राज्यसभेचे खासदार संजय राऊत म्हणाले की, ‘राम जन्मभूमी न्यासच्या प्रमुखांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. केवळ शिवसेनेच्या प्रयत्नांमुळेच अयोध्येतील राम मंदिर उभारणं शक्य होऊ शकते, असा विश्वास त्यावेळी न्यास प्रमुखांनी व्यक्त केला आहे. उद्धव ठाकरेदेखील लवकरच अयोध्येला जाणार आहेत’, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

त्यामुळे लवकरच राम मंदिराचं राजकारण तापण्याची शक्यता आहे. अनेक वर्षांपासून न्यायालयीन फेऱ्यात अडकलेलं हे प्रकरण पुन्हा लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे. केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेनेला आगामी निवडणुकीत विकासाच्या मुद्यावर बोलताना खूप अडचणी येणार आहेत, त्यात युती सरकारच्या काळात महागाईने उच्च स्तर गाठल्याने सामान्य लोकं सत्ताधाऱ्यांवर प्रचंड नाराज आहेत. त्यामुळेच भावनिक मुद्यांना हात घालणे हेच सत्ताधाऱ्यांचे मूळ उद्देश असणार आहे हे उघड होत आहे.

only shiv senas effort and nothing else which can help build ram temple says MP sanjay raut