पालघर : लोकसभा निवडणुकीचा सेना-भारतीय जनता पक्षाचा तिढा जवळपास सुटल्याचे निश्चित मानले जात आहे. पालघर लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित हे शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढविणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपानं २५-२३चा फॉर्म्युला तयार केला आहे. यावेळी भाजपानं पालघरची जागा शिवसेनेला सोडली आहे. चिंतामण वनगा यांचे गेल्या वर्षी जानेवारीत दिल्लीत निधन झाले होते. त्यानंतर त्या जागेसाठी त्यांचे पुत्र इच्छुक होते.

परंतु भारतीय जनता पक्षाने त्यांना डावलून राजेंद्र गावितांना उमेदवारी दिल्यानं श्रीनिवास वनगा यांनी आयत्यावेळी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर शिवसेनेकडून श्रीनिवास वनगा यांनी पोटनिवडणूक लढवली होती. परंतु ते पराभूत झाले. परंतु, त्यांनी भाजपाचे उमेदवार राजेंद्र गावित यांना कडवी टक्कर देत जवळपास अडीच लाख मतं मिळवली. त्यामुळे ही जागा शिवसेनेसाठी यंदा सोडण्यात आली. पण शिवसेनेकडून पालघरमध्ये यंदा पुन्हा भाजपाचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित उमेदवारी मिळणार असून, ते शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचे वृत्त आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेनेत २६-२२ असा फॉर्म्युला होता. त्यावेळी भाजपानं स्वत:च्या कोट्यातील दोन जागा मित्रपक्षांसाठी सोडल्या होत्या. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींनी हातकणंगलेमधून निवडणूक लढवली होती. त्यात ते विजयी झाले होते. तर महादेव जानकर बारामतीमधून निवडणुकीच्या आखाड्यात उतरले होते. ते राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळेंकडून पराभूत झाले होते. मात्र त्यांनी सुळे यांनी कडवी लढत दिली होती. दोन जागा मित्रपक्षांसाठी सोडणाऱ्या भाजपानं २०१४ मध्ये २४ जागा लढवल्या. त्यातील २३ जागा त्यांनी जिंकल्या. तर शिवसेनेनं २२ जागा लढवत १८ जागांवर यश मिळवलं होतं.

Palghar lok sabha constituency shivsena has announced candidature to rajendra gavit