नवी दिल्ली : मोदींचा साडेचार वर्षातील कार्यकाळ पाहिल्यास त्यांनी दिलेल्या ढीगभर आश्वासनांवरून सामान्य जनतेचा त्यांच्यावरील विश्वास पूर्णपणे उडाला आहे. आपण सर्वानी मोदींचा एकूणच पंतप्रधानपदाचा कार्यकाळ नीट पाहिल्यास हा काळ अनेक विरोधाभासात्मक कृतींनी व्यापलेला आहे असं जाणवेल. मागील लोकसभा निवडणुकीत जनतेकडून मिळालेले जनमत त्यांनी मोदींनी पूर्णपणे वाया घालवले आहे, अशी टीका माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केली आहे.
‘पॅराडॉक्सिअल प्राइम मिनिस्टर’ या शशी थरूर लिखित पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात डॉ. मनमोहनसिग यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले की, मोदींनी संपूर्ण देशाचा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती. परंतु, जातीय हिंसा, मॉब लिचिंग आणि गोरक्षकांचा उच्छाद अशा घटनांवर त्यांचे सरकार नेहमीच शांत राहिले आहे.
देशातील भेदरलेली जनता, अविचारी निर्णयांमुळे अर्थव्यवस्थेचे झालेले नुकसान, रोजगारांची कमतरता, शेतकऱ्यांमध्ये वाढत असलेला अविश्वास, शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, सीमारेषेवरील असुरक्षित वातावरण, काश्मीरमधील अस्थिरता आणि मोठा गाजावाजा करून सुरु करण्यात आलेल्या सरकारी योजनांचे अपयश ही मोदींच्या कारकीर्दीची व्यवच्छेदक लक्षणे राहिली आहेत. मोदींच्याच कार्य काळात देशात निधर्मीवाद, विविधता, स्वातंत्र्य, तसेच गेल्या अनेक दशकांपासून भारतीय समाजात अबाधित असलेली समानता या कशालाही थारा नसल्याची बोचरी टीकाही यावेळी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी केली.
