नवी दिल्ली : प्रसिद्ध बॉलिवूडची अभिनेत्री आणि ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा आणि प्रसिद्ध अमेरिकन गायक निक जोनास २ डिसेंबरला हिंदू पद्धतीने विवाहबद्ध झाले. त्याआधी ते शनिवारी, १ डिसेंबर रोजी ख्रिश्चन पद्धतीने विवाहबंधनात अडकले. त्यानंतर पुन्हा रविवारी २ डिसेंबरला पारंपरिक हिंदू पद्धतीने विवाह सोहळा संपन्न झाला होता. दरम्यान काल मंगळवारी दिल्लीतील ताज महल पॅलेस हॉटेलमध्ये प्रियांका-निकचं ग्रँड रिसेप्शन पार पडलं.
या ग्रँड रिसेप्शनसाठी प्रियांकाच्या कुटुंबातील सर्व सदस्य मंडळी आणि मित्र परिवार असे अनेक सेलिब्रेटी आणि व्हीआयपी व्यक्तींना विशेष निमंत्रण देण्यात आलं होतं. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींना सुद्धा निमंत्रित करण्यात आले होते. नरेंद्र मोदींनी उपस्थिती लावून हास्य विनोद केल्याचे दिसत आहे. परंतु, दुःखाची गोष्ट म्हणजे काही दिवसांपूर्वी बिकट परिस्थितीशी लढणारा बळीराजा दिल्लीत भव्य मोर्चा घेऊन आला होता. डोळयात अश्रू आणि अनेक मागण्या घेऊन दिल्लीत हाकेच्या अंतरावर आलेल्या शेतकऱ्यांना भेटून आणि त्यांच्या अडचणी समजून घेण्यास अजिबात वेळ नव्हता.
परंतु व्हीआयपी आणि सेलिब्रिटींचे निमंत्रण ते कधीच नाकारत नाहीत हा इतिहास आहे. त्यामुळे समाज माध्यमांवर मोदींच्या या व्हीआयपी हजेरीवर जोरदार टीका होताना दिसत आहे.
