मुंबई : सध्या लोकसभा निवडणूक जवळ येताच राम मंदिराच्या राजकारणाने जोर धरला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना डोकं नाही, आणि ते माझीच कॉपी करत आहेत, अशी टीका भारिप बहुजन संघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. दरम्यान, राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने केवळ मराठा समाजाची मते मिळवण्यासाठीच मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला, असे ते प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी २ दिवसांपूर्वी विक्रोळीतील एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी भारतीय जनता पक्षावर काही गंभीर आरोप केले होते. भाजप एमआयएम’चे प्रमुख ओवेसींच्या मदतीने देशात निवडणुकीच्या आधी आणि राम मंदिराच्या मुद्द्यावरुन दंगली घडवण्याचा डाव रचत असल्याचं वक्तव्य केले होते. त्यासंदर्भात मला दिल्लीवरून एकाने कॉल करून ही माहिती दिल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले होते.
याबाबत प्रकाश आंबेडकर यांना प्रश्न विचारण्यात आला. ते म्हणाले, मी हा मुद्दा महिनाभरापूर्वीच मांडला होता. त्यामुळे राज ठाकरेंना डोके नाही. ते माझीच कॉपी करत असून राम मंदिरावरुन दंगली घडवण्याचा कट शिजला जात असल्याचा आरोप मी महिनाभरापूर्वीच केला होता, असे त्यांनी सांगितले. आज ते त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला तेव्हा हे वक्तव्य केलं आहे.
वास्तविक, प्रकाश आंबेडकर आज जरी हा दावा करत असले की राज ठाकरे माझी कॉपी करत आहेत तरी हाती असलेले पुरावे वेगळाच सत्य सांगत आहेत. राज ठाकरे यांनी मार्च महिन्यात गुडीपाडव्याच्या सभेतच हा जाहीर आरोप केला होता. तर प्रकाश आंबेडकरांच्या म्हणण्यानुसार त्यांनी हे स्वतः हा आरोप महिन्याभरापूर्वी केला आहे. त्यावरून नक्की कोण कोणाला कॉपी करत आहे ते समोर येते आहे.
दुसऱ्या बाजूने पाहिल्यास सध्या प्रकाश आंबेडकर यांचे एमआयएम सोबत निवडणुकीच्या अनुषंगाने चांगलेच सख्य जमल्याचे दिसत आहे. तसेच राज ठाकरे यांनी थेट ओवेसींचं नाव घेऊन दावा केल्याने, प्रकाश आंबेडकर दुखावले असतील असं राजकीय विश्लेषकांना त्याच्या आत्ताच्या वक्तव्यावरून वाटतं आहे. तसेच एमआयएमची भूमिका आणि राजकारण भाजपाला पोषक ठरत असल्याचा सध्या आरोप होत असून, त्या मतांच्या ध्रुवीकरणात प्रकाश आंबेडकर यांच्यावर सुद्धा तोच अप्रत्यक्ष आरोप केला जात आहे. त्यामुळे प्रकाश झोतात येण्यासाठी त्यांनी राज ठाकरेंच्या बाबतीत असे वक्तव्य केल्याचे अनेक राजकीय तज्ज्ञांना वाटत आहे.
व्हिडिओ: काय म्हणाले होते राज ठाकरे मार्च महिन्यातील गुढीपाडवा मेळाव्यात राम मंदिराबाबत?
