पुणे : प्रत्येकासाठी महत्वाचा विषय असलेल्या शिक्षण तसेच रोजगाराच्या प्रश्नावर छात्रभारती विद्यार्थी संघटना आणि राष्ट्र सेवा दलाच्या वतीने पुण्यातील ऐतिहासिक महात्मा फुले वाड्यातून पुणे- मुंबई लाँग मार्चला काढण्यास सुरुवात झाली. विशेष म्हणजे यामध्ये हजारो विद्यार्थ्यांनी सहभागी नोंदवला आहे. पायी निघालेला हा मोर्चा ५- ६ दिवस रस्त्यांवरच मुक्काम ठोकत आणि येत्या २१ नोव्हेंबरला थेट मंत्रालयावर धडकेल असं वृत्त आहे.

महाराष्ट्रातील फडणवीस सरकारच्या विद्यार्थी तसेच शिक्षक विरोधी धोरणांच्या विरोधात आता खुद्द विद्यार्थ्यांनीच एल्गार पुकारला आहे. महाराष्ट्र शासनाने राज्यातील शाळा बंद करण्याचे अवलंबिलेले धोरण, ऐतिहासिक बाजू नसलेला, विज्ञानाशी विसंगत अभ्यासक्रम तयार करणे, आदिवासी-मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती कायम स्वरूपी बंद करणे तसेच शिक्षक भरतीसह संपूर्ण नोकरभरती बंद करणे याविरोधात हा लाँग मार्च काढला असल्याची माहिती छात्रभारती विद्यार्थी संघटनेचे कार्याध्यक्ष संदीप आखाडे यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना दिली आहे.

त्यामुळे ‘शिक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या मालकीचे’, ‘केजी टू पीजी मोफत शिक्षण मिळालेच पाहिजे,’ अशा घोषणांनी आंदोलक विद्यार्थ्यांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. विशेष म्हणजे या लाँग मार्चला आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थी व पुण्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. यावेळी विद्यार्त्यांसोबत डॉ. बाबा आढाव, सुरेश खैरनार, पन्नालाल सुराणा, आमदार कपिल पाटील, आमदार सुधीर तांबे, माजी आमदार जे यू नाना ठाकरे, सुभाष वारे, नगरसेविका अश्विनी कदम, अल्लाऊद्दीन शेख, विनय सावंत, संदेश भंडारे, जाकीर अत्तर, प्रमोद दिवेकर आदी मान्यवर सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते.

pune mumbai long march started from fule wada against fadanvis government policy on education and employment