मुंबई : आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उद्यापासून १० दिवसांच्या पश्चिम विदर्भ दौ-यासाठी रवाना होणार आहेत. आज सायंकाळी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून अमरावती एक्सप्रेसने रवाना होणार आहते. राज ठाकरे यांनी शहरी भागांसोबतच ग्रामीण महाराष्ट्राकडे सुद्धा लक्ष केंद्रित केले असून पक्षविस्तार तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची फळी उभी करणे हे त्यांच्या दौऱ्यामागील मूळ उद्देश असल्याचे समजते.

त्यामुळे या दौ-यात ते नेमकं काय बोलणार आणि विदर्भातील कार्यकर्त्यांना काय संजीवनी देऊन जाणार ते लवकरच समजेल. सध्या मनसेसाठी निवडणुकीपूर्वी पोषक वातावरण तयार होताना दिसत असून त्याचा फायदा पक्षासाठी कसा करून घेता येईल, याकडे पक्षाध्यक्षांचे विशेष लक्ष आहे. विशेष म्हणजे त्यांच्या विदर्भ दौऱ्यादरम्यान इतर पक्षातील नेत्यांचे तसेच पदाधिकाऱ्यांचे प्रवेश सुद्धा अपेक्षित आहेत. स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधून नवीन नियुक्त्या करून पक्ष बांधणी करणे आणि पक्षाला स्थानिक स्तरावर उभारी देण्यावर राज ठाकरेंचा विशेष भर आहे.

या दौ-यामध्ये त्यांच्यासोबत इतर पदाधिकारी देखील सर्व बैठकांना हजर असणार आहेत. १७ आॅक्टोबरला अमरावतीपासून दौ-याला सुरूवात होणार असून ‘अंबामहोत्सव’ला ते उपस्थित राहणार आहेत. २२ आॅक्टोबरला वणी, यवतमाळ, २३ आॅक्टोबरला यवतमाळ, वाशिम, अकोला, शेगाव, २४ आॅक्टोबरला बुलढाणा तर २६ आॅक्टोबरला राजमाता जिजाऊ जन्मस्थळास ते भेट देणार आहेत. मनसेच्या दृष्टीने हा दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे. या दौ-याला मिळणा-या प्रतिसादाकडे विविध राजकीय पक्षाचे विशेष लक्ष लागून राहिले आहे.

raj thackeray will leave for 10 days vidarbh tour