जयपूर-हैदराबाद : आज राजस्थान आणि तेलंगणामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल म्हणून या निवडणुकीकडे पहिले जात आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष या ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीकडे लागून राहिले आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाकडून आणि पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान, अनेक ठिकाणी ईव्हीएम बिघाड होण्याच्या घटना समोर येत आहेत असे वृत्त आहे.

राजस्थानमध्ये एकूण १९९ जागांसाठी २२७४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. असं असलं तरी मुख्य लढत ही काँग्रेस आणि भाजपा दोन पक्षांमध्येच आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांची प्रतिष्ठा जरी पणाला लागली असली तरी विविध निवडणूकपूर्व सर्वेक्षणांमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळण्याचे संकेत मिळत आहेत. मात्र, भाजपाध्यक्ष अमित शहा आणि मोदी यांनी शेवटच्या टप्यात विशेष जोर लावल्याने उत्सुकता वाढली आहे.

दुसरीकडे, तेलंगणामध्ये एकूण ११९ जागांसाठी मतदान पार पडणार आहे. तेलंगणमध्ये चंद्रशेखर राव यांच्या तेलंगण राष्ट्र समितीसमोर मुख्य आवाहन हे काँग्रेसचे आहे. येथे ३२ हजार ७१५ केंद्रांवर मतदान होत आहे. अंदाजे ३ कोटी नागरिक आज मतदानाचा हक्क बजावतील असे वृत्त आहे.

या दोन्ही राज्यांमध्ये आज पार पडत असून निकाल ११ डिसेंबरला रोजी घोषित होणार आहे.

rajasthan and telangana state assembly elections today