देहरादून: सरसंघचालक मोहन भागवत यांनी अयोध्येत राम मंदिराबद्दल अत्यंत महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. दरम्यान, उपस्थितांना संबोधित करताना सरसंघचालक म्हणाले की, ‘२०१४ मध्ये राम मंदिराचा मुद्दा नव्हता. जरी तेव्हा राम मंदिराचा मुद्दा नसता, तरी सुद्धा सरकार स्थापन झालं असतं. परंतु, २०१९ मध्ये राम मंदिर सर्वात महत्त्वाचा विषय आहे, असं सरसंघचालक म्हणाले.
२०१४ मधील लोकसभा निवडणुकीत देशात दुसरी लाट होती. आणि ती राम मंदिरापेक्षा सुद्धा वेगळी होती. परंतु, आगामी लोकसभा निवडणुकीत राम मंदिराचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रभू राम आपल्या सर्वांचं जिव्हाळ्याचं श्रद्धास्थान आहेत. देशात सरकार कोणत्याही पक्षाचं येवो, अयोध्येत राम मंदिराची उभारणी व्हायलाच हवी. असं न झाल्यास संतांशी चर्चा करुन आम्ही योग्य ती कार्यवाही करु, असं सूचक विधान मोहन भागवतांनी केलं.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या विधानांवर सुद्धा त्यांनी प्रतिक्रिया दिली. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘नितीन गडकरींचा स्वभाव अतिशय सौम्य आहे. कटकारस्थान करणं हा त्यांचा नैसर्गिक स्वभाव नाही. त्यांच्या मनात जर एखादी इच्छा असेल, तर ते सर्वात आधी मला सांगतील,’ असं भागवत म्हणाले.
