पुणे : पुण्यातील कोरेगाव- भीमा हिंसाचार पूर्वनियोजित कट होता. तसेच संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांनी हिंसा भडकण्यासाठी पूरक अशी परिस्थिती निर्माण केली होती आणि त्यातही स्थानिक पोलिसांच्या गाफिलपणामुळे हा हिंसाचार घडला असल्याचं सत्यशोधन समितीच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र या प्रकरणात नेमकी कोणती कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झालं आहे.

कोरेगाव- भीमा हिंसाचार घटनेनंतर कोल्हापूरच्या पोलीस महानिरीक्षकांनीच पुण्याचे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या अध्यक्षतेखाली या सत्यशोधन समितीची स्थापना करण्यात आली होती. त्याच सत्यशोधन समितीने कोल्हापूरच्या पोलीस महानिरीक्षकांकडे तो संपूर्ण अहवाल सादर केला. त्यानुसार या हिंसाचाराबाबत अनेक विषय नमूद करण्यात आले आहेत. त्यात धक्कादायक म्हणजे वढू बुद्रुक आणि गोविंद गायकवाड यांच्या इतिहासाची मोडतोड करण्यासाठीच मिलिंद एकबोटे यांनी धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समितीची स्थापना केली होती, असा गौप्यस्फोट यात करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे संभाजी महाराजांच्या समाधीस्थळावरील गोविंद गायकवाडांची माहिती देणारा बोर्ड हटवून त्याजागी आरएसएस’चे संस्थापक हेडगेवार यांचा गरज नसताना सुद्धा फोटो लावण्यात आला होता. सवर्ण आणि इतर जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न होता. दुसरी धक्कादायक गोष्ट म्हणजे, सणसवाडीतील लोकांना या हिंसाचाराची आधीच माहिती होती आणि त्यामुळेच गावातील दुकाने तसेच हॉटेल्स आधीच बंद ठेवण्यात आली होती. जर स्थानिक पोलिसांनी वेळीच योग्यती दक्षता घेतली असती तर हा हिंसाचार टाळता येणं शक्य होत असं या अहवालात सांगण्यात आलं आहे.

अजून धक्कादायक म्हणजे त्यांनी पाण्याचे टँकर केरोसिन’ने भरून ठेवले होते आणि गावात काठ्या तसेच तलवारी आधीच आणून ठेवल्या होत्या, असा गौप्यस्फोटही अहवालात करण्यात आला आहे. स्थानिक पोलिसांना हिंसाचाराची माहिती देणारे अनेक दूरध्वनी संदेश करण्यात आले. मात्र पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळेच पोलीस आपल्यासोबत आहेत, कोणीही काळजी करू नका, अशा घोषणा त्या ठिकाणी देण्यापर्यंत जमावातील काहींची मजल गेली,’ असं सत्यशोधन समितीनं अहवालात नमूद केल्याने अनेकांना धक्का बसला आहे. याच हिंसाचारानंतर संपूर्ण महाराष्ट्रात जाळपोळ आणि दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती आणि अनेकांनी त्यानंतर असलेल्या हिंसाचारात प्राण गमावले होते.

Satya Shodhak samiti for bhima koregaon claims that violence were pre planned and sambhaji bhide and milind ekbote were involved