मुंबई : बेस्ट कामगारांनी तब्बल ८ दिवसांनंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने संप मागे घेतला. मात्र मुंबई बेस्ट कामगारांच्या संपात भारतीय जनता पक्षाने तेल ओतलं आणि त्यांनीच कामगारांना शिवसेनेच्या नावाने शहरभर बोंबाबोंब करण्यास सांगितले, अशा रोखठोक टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’मधून केली आहे.
‘बेस्ट’सारखे लोकउपयोगी उपक्रम पूर्वी फायद्यात होते आणि त्यास बरीच कारणे आहेत. फक्त ट्रेन आणि बेस्ट हीच २ मुख्य साधने प्रवासासाठी सामान्यांना उपलब्ध होती. आज घरटी २ गाड्या आहेत. ओला, उबेर, मेट्रो, मोनोरेलने नवे मार्ग निर्माण केले. त्याचा सुद्धा आर्थिक फटका ‘बेस्ट’ला बसलाच आहे. या प्रचंड तोट्यात असलेल्या उद्योगाचे खासगीकरण करून विषय संपवायचा, की असलेलं टिकवून मराठी लोकांच्या नोकऱ्या वाचवायच्या याचे उत्तर आधी फुकटची ‘राव’गिरी करणाऱ्यांनी व त्या रावांचे पडद्यामागून सूत्रसंचालन करणाऱ्यांनी द्यावे.
सामान्य जनता रंक आणि खाक झाली तरी चालेल, पण असल्या नेत्यांची ‘राव’गिरी मात्र चिरंतर चालत राहिली पाहिजे. आम्ही या विचारांचे नाही. परंतु, ज्यांना बोंबलायचे, त्यांनी खुशाल बोंबलावे असे सामनाच्या आजच्या अग्रलेखात म्हटले आहे.
