मुंबई : सध्या देशभर शहर आणि विविध स्थानकांचे नामकरण करण्याचा सपाटा लावण्यात आला आहे. मूळ पायाभूत सुविधा दुर्लक्षित करून लोकांना धार्मिक नामकरणाच्या आडून मूर्ख बनवण्याचे उद्योग सुरु आहेत. यात सर्वाधिक विक्रम उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहेत. त्याचा परिणाम आता सत्ताधारी शिवसेनेच्या नेत्यांवर सुद्धा झाल्याचे समजते.

कारण मुंबईतील मलबार हिल या उच्चभ्रू लोकवस्ती नामकरण बदलून ते ‘रामनगरी’ असे करण्याची मागणी थेट ठरावाच्या सूचनेद्वारे महापालिकेच्या महासभेपुढे करण्यात आल्याचे वृत्त आहे. काही महिन्यांपूर्वी स्थायी समितीतील पद आणि आमदारकीचं लक्ष समोर ठेऊन मनसेतून शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सुधार समितीचे अध्यक्षपद मिळवणारे दिलीप लांडे यांनी ही मागणी मुंबई महानगर पालिकेत केल्याचे वृत्त आहे.

त्यांच्या म्हणण्यानुसार मलबार हिल हे नाव ब्रिटिश काळापासूनचे आहे. मात्र मलबार हिल भाग मुळात खूप प्राचीन असून येथे सीतामातेच्या शोधात निघालेले प्रभू रामचंद्र आणि त्यांचे बंधू लक्ष्मण यांनाही या भागात काही काळ वास्तव्य केल्याचे बोलले जाते. त्यामुळे विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन मलबार हिलचे नाव बदलून आता ‘रामनगरी’ करावे, अशी थेट मागणी लांडे यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे.

दरम्यान, सध्या मलबार हिलच्या नामकरणाची मागणी केवळ प्रस्ताव स्वरूपात पुढे करण्यात आली आहे. त्यानंतर सदर ठरावाची सूचना मुंबई महापालिकेच्या महासभेत अधिकृतरीत्या मंजूर करण्यात येईल. शेवटी तो मंजूर झाल्यानंतर महापालिकेचे आयुक्त अजय मेहता यांच्याकडे अभिप्रायासाठी तो पाठविण्यात येणार आहे असे वृत्त प्रसार माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत आहेत.

shivsena leader dilip lande demand rename malabar hill to ramnagiri