नवी दिल्ली : स्मार्ट सिटी परियोजनेंतर्गत निवडण्यात आलेल्या नागपूर, औरंगाबाद, पुणेसह महाराष्ट्रातील आठ शहरांसाठी केंद्र सरकारने आतापर्यंत १,५६८ कोटी रुपये दिले आहेत; मात्र वस्तुस्थिती ही आहे की, ४ वर्षांनंतर देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवडत्या योजनेंतर्गत निर्धारित कार्यांतील ५८ टक्के कामांना अद्याप सुरुवातच करण्यात आल्याचे निष्पन्न झालं आहे.
योजनेंतर्गत महाराष्ट्रातील पिंपरी-चिंचवड, नाशिक, ठाणे, सोलापूर, कल्याण-डोंबिवली, औरंगाबाद, पुणे आणि नागपूरची निवड झाली होती. या सगळ्या शहरांत एकूण १३,२८८ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून वेगवेगळी विकास कामे पूर्ण केली जाणार होती; मात्र शहर विकास मंत्रालयाकडील आकडेवारीनुसार त्यातील ५,९०६ कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे काम एक तर सुरू केले गेले आहे किंवा पूर्ण झाले आहे. हे एकूण कामांच्या जवळपास ४२ टक्के आहे, तर ५८ टक्के कामे अजून सुरू व्हायच्या प्रतीक्षेत आहेत. पुणे शहरात सगळ्यात जास्त ३,९७५.८२ कोटी रुपयांची कामे केली जाणार होती. त्यात १,५९४.७ कोटी रुपयांचीच कामे सुरू केली गेली आहेत. वेगाने कामे करण्यात नागपूर सगळ्यात पुढे आहे. नागपूरमध्ये एकूण १८९४.३४ कोटी रुपये गुंतवणुकीतून होणाऱ्या कामांतून १,६५६.९४ कोटी रुपयांची कामे सुरू आहेत किंवा पूर्ण झाली आहेत. मंत्रालयातील दस्तावेजानुसार महाराष्ट्रातील आठ शहरांपैकी प्रत्येकाला १९६ कोटी रुपये केंद्र सरकारकडून स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत दिले गेले आहेत. शहर विकास राज्यमंत्री हरदीप पुरी यांनी नुकतेच संसदेत हे मान्य केले की, स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शंभर शहरांसाठी २५ जानेवारीपर्यंत १,०५,००० कोटींच्या २,७४८ कामांसाठी निविदा काढण्यात आल्या. त्यातील ६२,२९५ कोटीच्या २,०३२ प्रकल्पांचे काम सुरू झाले आहे.
महाराष्ट्रातील एकूण आठ शहरांची स्थिती (रुपये कोटींमध्ये)
शहर केंद्राचा निधी अंदाजे खर्च चालू/पूर्ण योजनांचा खर्च
- पिंपरी चिंचवड १९६ ११४०.८५ ३१५.९१
- नाशिक १९६ १५८७.५७ ८९३.०९
- ठाणे १९६ १५१०.८३ ६३४.३३
- सोलापूर १९६ १८८१.२९ ३४६.०३
- क. डोंबिवली १९६ ९४०.४८ २२८.४८
- औरंगाबाद १९६ ३५७.०२ २३७.०२
- पुणे १९६ ३९७५.८२ १५९४.७
- नागपूर १९६ १८९४.३४ १६५६.९४
एकूण १५६८ १३२८८.२ ५९०६.५
