नवी दिल्ली : अयोध्येतील बाबरी मशीद आणि राम जन्मभूमी जमीन वादाबाबत अलाहाबाद हायकोर्टाने २०१० साली दिलेल्या निकालावरील आव्हान याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आता थेट पुढच्या वर्षी म्हणजे २०१९ मध्ये सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात सोमवारी अयोध्या प्रकरणावर सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्यायमूर्ती. संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती. के. एम. जोसेफ यांच्या समोर सुनावणी झाली. दरम्यान, त्यावर सर्वोच्च न्यायालयाने संबंधित याचिकांवर आता थेट २०१९ मध्ये सुनावणी घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

काय आहे नेमका वाद?

अयोध्येतील रामजन्मभूमी आणि बाबरीप्रकरणी अलाहाबाद हायकोर्टाने ३० सप्टेंबर २०१० साली दिलेल्या निकालाविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या १३ याचिकांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. अयोध्येतील २.७७ एकर वादग्रस्त भूमीचे हायकोर्टाने सुन्नी वक्फ बोर्ड, निर्मोही आखाडा तसेच भगवान रामलल्ला अशा ३ पक्षकारांमध्ये विभाजन करण्याचा आदेश देण्यात आला होता. तसेच जिथे रामलल्लाची मूर्ती आहे ती जागा रामलल्ला विराजमानला, सीता रसोई आणि राम चबुतऱ्याची जागा निर्मोही आखाड्याला आणि उर्वरित एक-तृतियांश जागा सुन्नी वक्फ बोर्डाला देण्याचे आदेश सुनावण्यात आले होते. परंतु, या निकालाविरुद्ध रामलल्ला विराजमान, हिंदू महासभा आणि सुन्नी वक्फ बोर्डासोबत इतर अनेक पक्षकारांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केल्या आहेत.

supreme court adjourns matter till next year january on ayodhya ram mandir case