मुंबई : शिवसेना राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी अवनी वाघिणीला गोळ्या घालून ठार केल्याने टीकेची झोड उठवली आहे. तसेच मागील ४ वर्षांत कित्येक शेतकऱ्यांनी महाराष्ट्रात आत्महत्या केल्या, तर राज्यातील सरकारवर (राज्यात भाजप-सेनेचं युती सरकार आहे) सुद्धा गोळ्या झाडायच्या का, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
सध्या देशभर अवनी वाघिणीला नरभक्षक ठरवून गोळ्या घालून ठार मारण्यात आल्याने सरकारला जोरदार टीका सहन करावी लागत आहे. त्यात सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने सुद्धा या प्रकरणावरून टीकास्त्र सोडले आहे. दोन दिवसांपूर्वी यवतमाळमध्ये अवनी या वाघिणीची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. यासाठी हैदराबादहून विशेष शूटर मागविण्यात आले होते. महाराष्ट्रात एवढे एन्काऊंटर झाले. आणि त्यात अनेक खोटेही होते. मात्र वाघिणीला अन्य मार्गाने वाचविता आले असते. परंतु, वनमंत्री मुनगंटीवारांनी ते जास्त मनावर घेतले नाही.
त्यात काल भाजपच्याच केंद्रीय मंत्री मनेका गांधींनी सुद्धा यावर ट्विट करून आवाज उठवला होता. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे स्वतः वाईल्डलाईफ फोटोग्राफर आहेत. आणि त्यांची मुलेही आहेत. त्यात शिवसेनेचे चिन्ह वाघ असल्याने हा विषय आमच्यासाठी जिव्हाळ्याचा असल्याचेही संजय राऊत प्रसार माध्यमांशी याविषयावर संवाद साधताना म्हणाले.
